शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा यासाठी अनेक कल्पना मांडल्या जात असून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना यापुढे पूर्ण ग्लास भरून पाणी देऊ नका, तर अर्धा ग्लासच पाणी द्या, असे आवाहन केले जात आहे. केवळ पत्रके प्रसिद्ध करून नाही तर प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जाऊन आणि हॉटेल मालकांची भेट घेऊन त्यांना हे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक हॉटेलमध्ये आता अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. हॉटेल मालक तसेच हॉटेल चालकांची भेट घेऊन त्यांना पाणी बचतीबाबतची विनंती करण्याचा हा उपक्रम शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या विविध हॉटेलमध्ये जाऊन पाणीबचतीचे आवाहन करत आहेत. ‘छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून पाण्याची बचत शक्य असल्याचे आम्ही सांगत आहोत. तसेच हॉटेलमालकांना गुलाबपुष्प देऊन तसेच पत्रके देऊन त्यांना विनंती करत आहोत,’ असे भारतीय विद्यार्थी सेनेच्या निमंत्रक मनीषा धारणे यांनी सांगितले. मध्य भागातील हॉटेलमध्ये जाऊन पाणीबचतीची विनंती करणारी पत्रके देण्याचा उपक्रम शिवसेनेच्या शहर संघटक राधिका हरिश्चंद्रे, उपशहर प्रमुख विशाल धनवडे, मनीषा धारणे, अमृता गोडबोले, पद्मा सोरटे, गजानन पंडित, चंदन साळुंखे, विकी तळेकर, प्रभात गोडबोले यांनी केला. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना पूर्ण ग्लास भरून पाणी देण्याची पद्धत आहे. मात्र तसे न करता आलेल्या ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी दिल्यास आवश्यकतेएवढेच पाणी वापरले जाईल. सध्या पूर्ण ग्लास भरून पाणी दिले जात असल्यामुळे न प्यायलेले पाणी टाकून दिले जाते. त्या ऐवजी अर्धा ग्लास पाणी द्यावे आणि जर एखाद्या ग्राहकाला आणखी पाणी हवे असेल तर पुन्हा ते देणे शक्य आहे. त्यामुळे पाण्याची बचत होईल, असे सध्या सर्व हॉटेलचालकांना सांगितले जात आहे. तसेच टेबलवर पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या तर ग्राहक आवश्यक तेवढेच पाणी घेतील, असेही सांगितले जात आहे. त्या बरोबरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पाणीबचतीची आवाहन करणारी पत्रकेही वाटली जात असून उपक्रमाचे हॉटेलमधील ग्राहकांकडूनही स्वागत होत असल्याचा अनुभव कार्यकर्त्यांना येत आहे.