अपूर्णावस्थेतील ३५ श्लोकांचे दुर्मीळ हस्तलिखित विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८ व्या शतकातील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्यरूपी दुर्मीळ हस्तलिखिताचा शोध लागला आहे. संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेले आणि ३५ श्लोकांचा समावेश असलेले हे काव्य मात्र अपूर्णावस्थेतच राहिले आहे. १८ व्या शतकातील पंढरपूर क्षेत्रातील महान पंडित धर्मसिंधूकार काशिनाथ उपाध्याय तथा बाबा पाध्ये हे ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्याचे रचनाकार. त्यांनी विठ्ठलावर अनेक काव्ये लिहिली. १७८० मधील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’चे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्यामध्ये मिळाले. या काव्यामध्ये ३५ श्लोकांचा समावेश आहे. हस्तालिखिताची सुरूवातच ‘नमो भगवते विठ्ठलाय’ अशी आहे. ‘छंद देवता कीलक न्यास’ या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती हस्तालिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली. विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय पाध्ये यांच्याकडे जाते. बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती, असेही मंजूळ यांनी सांगितले.