हर्षवर्धन पाटील यांचा दावा

देशभरातील भाजपचे अनेक आमदार व खासदार काँग्रेसच्या वाटेवर आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात बोलताना केला.

पुणे व पिंपरीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निघोजे येथील दोन दिवसीय संवाद शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले, नागपूरचे आमदार आशिष देशमुख, खासदार नाना पटोले ही सुरुवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हुकूमशाहीला कंटाळलेले अनेक जण काँग्रेसच्या वाटेवर आहेत. मोदी लाट ओसरली आहे.

राज्यातील फडणवीस सरकार जाहिरातीत फसलेले निष्क्रिय सरकार आहे. शेतक ऱ्यांना कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव फक्त कागदावरच राहिला आहे. सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही. केवळ इशारे देण्यापेक्षा शिवसेनेने कृतीतून आपली आक्रमक भूमिका दाखवून द्यावी.