लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शहराबरोबरच धरणक्षेत्रांतही मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसभरात जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात किंचित वाढ झाली असून गेल्या काही वर्षांत प्रथमच मोसमी पाऊस सक्रिय होण्याअगोदरच यंदा मोठय़ा प्रमाणात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री टेमघर धरण परिसरात ११ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात २२ मि.मी., पानशेत परिसरात २४ मि.मी. आणि खडकवासला धरणक्षेत्रांत २६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर, बुधवारी दिवसभरात म्हणजेच सकाळी आठ ते सायंकाळी पाच वार्जेयत टेमघर धरण क्षेत्रांत तब्बल १०३ मि.मी. आणि खडकवासला धरण परिसरात दहा मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. वरसगाव आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दिवसभरात दमदार पाऊस पडला. दरम्यान, टेमघर धरणाची दुरुस्ती सुरू असल्याने हे धरण यापूर्वीच रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित तीन धरणांमध्ये मिळून सध्या ६.८५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठय़ाची टक्केवारी २३.५१ एवढी आहे. गेल्या वर्षी ३ जूनपर्यंत धरणांमध्ये साडेतीन टीएमसी म्हणजेच केवळ बारा टक्के पाणीसाठा होता, असेही जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

यंदा धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा

मोसमी पाऊस सक्रिय होण्याआधी दरवर्षी धरणे तळ गाठत असतात. मात्र, उन्हाळा संपल्यानंतरही यंदा प्रथमच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे सर्व धरणे काठोकाठ भरली होती. यंदा मोसमी पाऊस सक्रिय होण्याअगोदरच ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे धरणांच्या परिसरात मोठा पाऊस पडला. गुरुवारी देखील धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आली.