राज्यावर कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभाव कायम असल्याने मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण विभागात सलग तिसऱ्या दिवशीही दमदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही जोरदार पाऊस झाला. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्हे वगळता इतरत्र एक-दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा आता गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कार्यरत आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात हवेची चक्रीय स्थिती आहे. या दोन्ही बाबींचा परिणाम म्हणून राज्याची किनारपट्टी आणि जवळच्या भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

मध्य महाराष्ट्रात दक्षिण भागांत आणि प्रामुख्याने घाटक्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्वर, सातारा, लोणावळा येथे पावसाचा जोर जास्त होता. पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर या जिल्’ाांतही पावसाची नोंद झाली. विदर्भात अनेक जिल्ह्य़ांमध्ये मध्यम पावसाची हजेरी असून, बुलढाणा जिल्ह्य़ात पावसाचा जोर अधिक आहे. मराठवाडय़ात मात्र, पावसाचा जोर नव्हता.

जूनअखेर ६३ टक्के पेरण्या

राज्यात यंदा सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्याने जूनअखेर खरिपाच्या ६३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. औरंगाबाद विभागात सर्वाधिक ७४.७९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. राज्यात खरिपाचे एकूण क्षेत्र १४१.९९  लाख हेक्टर असून त्यापैकी ८९.५१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

गेल्या चोवीस तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

कोकण विभाग : ठाणे (३३८), मंडणगड (२२५), श्रीवर्धन (२३०), माथेरान, पनवेल, उरण (२१०), मुंबई, सांताक्रूझ (२००), कल्याण, दापोली (१९०), चिपळूण, भिरा, पोलादपूर, उल्हासनगर (१७०), बेलापूर, पेण (१५०), अंबरनाथ, भिवंडी, खेड, पालघर, वसई (१४०), कणकवली, राजापूर, सुधागड पाली (१३०), मुरूड, रोहा, सावंतवाडी, (१२०), अलिबाग, देवगड, कर्जत, खालापूर, मालवण (११०). मध्य महाराष्ट्र :  महाबळेश्वर (१४०), लोणावळा कृषी (११०), गगनबावडा (११०), विदर्भ : भामरागड (७०), वर्धा, चंद्रपूर (६०).

पवई तलाव तुडुंब

* विविध छोटय़ा-मोठय़ा उद्योगांना पाण्याचा पुरवठा करणारा पवई तलाव रविवार, ५ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला.

* गेले तीन दिवस तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव भरून वाहू लागल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली.

* मुंबईमधील पाण्याची गरज लक्षात घेऊन ब्रिटिश काळात पवई तलावाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. या कृत्रिम तलावाचे बांधकाम १८९० मध्ये पूर्ण झाले.

* या तलावाच्या बांधकामासाठी १२ लाख ५९ हजार रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र ६.६१ चौरस किलोमीटर इतके असून तलावाची पूर्ण भरून वाहण्याची क्षमता १९५ फूट आहे. तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ५,४५५ दशलक्ष लिटर इतकी आहे.