खबरबात – काँग्रेस, पुणे

सर्वात जुना पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये शहरावर वर्चस्व राखण्यासाठी आणि नेतृत्वासाठीची छुपी लढाई सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम आणि हर्षवर्धन पाटील या दिग्गज नेत्यांना शहर संघटनेत फारसे स्थान न देता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहर काँग्रेसच्या माध्यमातून सर्व सूत्रे हाती घेतली आहेत.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहाराच्या आरोपात तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी अडकले. काँग्रेस पक्षात कलमाडी यांना मानणाऱ्यांची संख्या मोठी होती. शहर काँग्रेसवरही त्यांचे एकहाती नियंत्रण होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर कलमाडी यांचे नेतृत्व मागे पडले. याच कालावधीत पुण्याची धुरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आली. विधानसभा, लोकसभा निवडणुकीबरोबरच पुण्याच्या प्रश्नांमध्येही लक्ष घालण्यास चव्हाण यांनी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे शहर काँग्रेसवर वर्चस्व ठेवण्याचीच चढाओढ काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू झाल्याचे दिसत आहे. पुण्यात वास्तव्य असल्याचा दावा करत ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम आणि विश्वजित कदम यांनी पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा जाहीर रीत्या बोलूनही दाखविली होती. विधानसभेत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही याच कालावधीत पुण्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे काँग्रेस पक्षातील बेबनावही काही वेळा पुढे आला.

पक्षाची चांगली संघटनात्मक बांधणी व्हावी आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरात लक्ष घालावे, अशी मागणीही जोर धरू लागली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि पतंगराव कदम हे शहराचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले होते. पण सध्या पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:हूनच पुण्यात लक्ष देणे कमी केले असल्याची उघड चर्चा काँग्रेस पक्षात सुरू आहे.

चव्हाण यांना लक्ष घालण्यास सांगतानाच त्यांना अन्य ‘सहकारी’ दिल्यामुळे आणि अंतर्गत वाद टाळण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पर्धेतून बाहेर पडणेच पसंत केल्याचेही कार्यकर्ते सांगतात. सध्या हर्षवर्धन पाटील यांचे शहरात लक्ष असले, तरी शहराध्यक्ष रमेश बागवे हेच प्रदेशाध्यक्षांच्या सांगण्यानुसार पक्ष चालवित आहेत. शहर काँग्रेसकडून आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकांना, आंदोलनांना तसेच मेळाव्यांना हर्षवर्धन पाटील सातत्याने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचेच शहर काँग्रेसवर पूर्ण नियंत्रण राहिले आहे, अशी चर्चाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. वर्चस्व आणि नेतृत्वाच्या या छुप्या लढाईमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजीही अनेक वेळा पुढे आली आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला हे आव्हान पेलावे लागणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या कार्ड कमिटीच्या बैठकीतही पक्षातील ही अंतर्गत गटबाजी पुढे आली होती. पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांना कार्ड कमिटीमधून डावलून काही जणांचा आश्चर्यकारक रीत्या प्रवेश करण्यात आला होता. हा सारा प्रकार वर्चस्वाच्या लढाईतूनच झाला असल्याचे बोलले जात होते. पक्षात गट-तट नाहीत, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार सर्व मतभेद दूर झाले आहेत. आजी-माजी आमदार एकदिलाने काम करीत आहेत, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने स्पष्ट करण्यात येत आहे. त्यांची ही विधानेच वर्चस्व आणि नेतृत्वाची लढाई स्पष्ट करणारी आहेत.