या देशामध्ये हिंदूू आणि मुस्लीम हे समाज नसून दोन राष्ट्र असल्याने हिंदूू-मुस्लीम ऐक्य हे केवळ मृगजळच आहे, अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची इस्लाम धर्माच्या अभ्यासानंतरची धारणा होती, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले.‘शालोम’ संघटनेतर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम’ या विषयावर प्रा. शेषराव मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा विषय उलगडताना मोरे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या लेखनाचे संदर्भ देत आंबेडकरांच्या लेखनातील उताऱ्यांचे वाचनही केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रा. मोरे म्हणाले, १९२३ मध्ये भारतात परतल्यानंतर येथे हिंदूू-मुस्लीम ऐक्य हा प्रश्न महत्त्वाचा असल्याची त्यांना जाणीव झाली. इस्लामचे राजकारण हे मुख्यत: धार्मिक असते. मुस्लीम राष्ट्रांमध्ये धर्म हा राजकीय धोरणांचा नियंत्रक आहे. मुस्लीम नेते कुराण आणि हदीस यांना डावलणे शक्य नसल्याने कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी हिंदूू-मुस्लीम ऐक्य शक्य नाही आणि ते व्यवहार्यदेखील नाही असे मत बाबासाहेबांनी व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य मिळविणे यापेक्षाही ते टिकविणे किती अवघड आहे याची जाणीव असल्यानेच त्यांनी १९४२ च्या चले जाव चळवळीला पाठिंबा दिला नाही. मुस्लीम स्त्री ही जगातील असाहाय्य व्यक्ती असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.मुस्लीम समाजाइतकेच सामाजिक दोष हिंदूू समाजामध्येही आहेत. हिंदूूंना धाक बसावा या उद्देशाने आंबेडकरांनी आपण इस्लाम धर्म स्वीकारू असे १९२७ ते १९३२ या कालावधीत म्हटले असले तरी त्यांना इस्लाम धर्माविषयी कधीच आकर्षण नव्हते. मनुस्मृती जाळूनसुद्धा या देशामध्ये हिंदूू म्हणून राहता येते. असे स्वातंत्र्य अन्य कोणत्याही धर्मात नाही हे त्यांनी नमूद केले आहे. सर्वाच्या टीका सहन करणारे डॉ. आंबेडकर यांचे स्थान ध्रुवताऱ्यासारखे अढळ आहे. त्यांची मते पटली नाही तर अभ्यास करून त्याचा प्रतिवाद करावा, अशी अपेक्षा प्रा. मोरे यांनी व्यक्त केली.