हिंजवडीतील दोन मुलींवरील बलात्कारप्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. त्या मुलींवर याअगोदरही लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून पोलिसांनी मंगळवारी आणखी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनी ऊसतोडणी कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यातील एका मुलीचा १९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम गणेश निकम (वय २२) याला अटक केली होती. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपावर टीकास्त्र सोडले. मंगळवारी या बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, याबाबत सविस्तर माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलींवर यापूर्वीही लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरण नेमके काय? पीडित मुली १६ सप्टेंबर रोजी परिसरातील मंदिराच्या आवारात खेळायला गेल्या होत्या. यादरम्यान गणेश व त्याच्या साथीदाराने त्या मुलींना गाठले. त्यांनी चॉकलेटचे आमिष दाखवून मंदिराच्या पाठीमागे असलेल्या झाडीमध्ये नेऊन दोघींवर बलात्कार केला. दोन्ही पीडित मुलींनी झालेला प्रकार घरी सांगितला नव्हता. मात्र, मंगळवारी एकीच्या पोटात दुखू लागल्याने तिला औंध येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर महिला पोलिसांनी दुसऱ्या मुलीला विश्वासात घेत तिला बोलते केले. यानंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली.