सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज(शुक्रवार) सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापा टाकला. तसेच, ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

“या संदर्भात मी काही बोलण्याची गरज आहे, असं वाटत नाही. यंत्रणेचा तपास सुरू आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे. त्यामुळे या संदर्भात मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. ”असं गृहमंत्री वळसे पाटील यावेळी प्रतिक्रिया देताना तसेच, मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा

गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती.