राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (रविवार) एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री कंगना रणौतवर तिचे नाव न घेता निशाणा साधल्याचे दिसून आले. तसेच, यावेळी त्यांनी या प्रकरणी भाजपाने घेतलेल्या भूमिकेवरून भाजपाचा उल्लेख न करता टीका केल्याचेही दिसले.

“मी त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायचा प्रश्न नाही, ती काय नाव घ्यायच्या लायकीची नाही. त्यामुळे तिचं नाव न घेता एवढच सांगतो. की ज्या पद्धतीने मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं काम, महाराष्ट्राला पाकिस्तान म्हणण्याचं काम, मुंबई पोलिसाला माफिया म्हणण्याचं काम ज्या कुणी व्यक्तीनं केलं. एकाप्रकारे महाराष्ट्राच्या अस्मितेला दुखवण्याचं काम केलं. अशा या व्यक्तीला जेव्हा एखादा राजकीय पक्ष खतपाणी घालण्याचं काम करतो. तर त्याचा देखील विचार समाजाने करायला पाहिजे, हा सुद्धा मी समजतो महत्वाचा प्रश्न आहे. आपण सांगितलं की सर्व समाजाने तिचा धिक्कार केला पाहिजे, ही खरी गोष्टं आहे. पण राजकीय फायदासाठी जर काही गोष्ट अशा पद्धतीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन होत असेल, तर हा सुद्धा एक गंभीर विषय आहे, असं मी म्हणेल.” असं अनिल देशमुख आपल्या भाषणाप्रसंगी म्हणाले.

पुण्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सन्मान खाकी वर्दीचा या कार्यक्रमादरम्यान करोना महामारीमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या राज्यातील अनेक भागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.