उत्तर प्रदेशात आम्ही ७३ ऐवजी ७४ जागा जिंकू पण ७२ होऊ देणार नाही. तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महाआघाडीला लक्ष्य केले.

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमित शाह म्हणाले की, देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी केली जात आहे. हे कसले गठबंधन ? हे तर सगळे राज्यातले नेते आहेत. जर महाराष्ट्रात ममतांची सभा कोल्हापूरला लावली. अखिलेशला धुळयाला बोलावले तर कोणी ऐकायला जाणार आहे का? अशा शब्दात महाआघाडीमधील नेत्यांवर सडकून टीका केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधक सत्तेवर आल्यास आपण कित्येक वर्ष मागे जाऊ आणि हे काँग्रेसवाले जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करतील. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने भाजपला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करीत आहे. ते या राज्यातील असून त्यांचे १५ वर्ष सरकार महाराष्ट्रात होते. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. पण आमच्या सरकारने पारदर्शक कारभार करीत भ्रष्ट्राचार नष्ट केल्याचे सांगत शरद पवार यांच्यावर टीका केली.

ते पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बनवणार असून भाजपा त्यासाठी कटिबद्ध, वचनबद्ध आहे. पण या प्रश्नावर शरद पवार आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी मंदिरा बाबत भूमिका स्पष्ट करावी. तुम्हाला मंदीर करायचे आहे की नाही. यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी.

राहुलबाबा आग्र्यामध्ये जाऊन म्हणाले की, शेती करू त्यांना आलू कारखान्यातून येतो असे वाटले. जमीनीवर येतो की जमीनीखाली हेच माहिती नाही. तर ते त्यांनी अगोदर समजून घ्यावे आणि त्यावर बोलावे. त्याच बरोबर आम्ही शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रूपये देणार, त्यावर टिका करतात, मग ५५ वर्षात तूम्ही काय दिले ते देखील राहुल बाबांनी सांगावे. आम्ही सैनिकांसाठी वन र्ँक वन पेन्शनचा नारा दिला आणि काँग्रेसचा एकच नारा ओन्ली राहूल ओन्ली प्रियंका अशा शब्दात गांधी परिवारावर निशाणा साधला.