राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अप्रत्यक्ष समाचार घेतला. आदिती तटकरे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे बोलत होत्या.

सध्या सर्वसामान्यांमध्ये इंदुरीकर महाराजांची मोठी क्रेझ आहे. आपण सर्वजण त्यांचे कीर्तन-प्रवचन ऐकत असतो. प्रसिद्ध व्यक्ती असताना बोलताना तारतम्य बाळगायला हवं. आपले मत सामाजिक किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असताना निश्चितपणाने महिलांचा, समाजातील व्यक्तींचा सन्मान राखणं महत्वाचं आहे. व्यासपीठावर आपण एकटे म्हणून मत मांडत नसतो. आपल्याकडे लाखो नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे या गोष्टींची दक्षता एक सुजान व्यक्ती म्हणून बाळगायला हवी, असं मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.

व्हॅलेंटाईन डे निमित्त अमरावतीलगतच्या चांदूर येथे असलेल्या महाविद्यालयात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, “मुलींना अशी शपथ द्यायला लावणं ही दुर्दैवी बाब असल्याचं राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

व्हॅलेंटाईन डे चे निमित्त साधून शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर या ठिकाणी महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रेम, प्रेम विवाह न करण्याची शपथ शुक्रवारी देण्यात आली होती. या शपथेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही मुलींनाच अशी शपथ का दिली गेली असा प्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “व्हॅलेंटाईन डे निमित्त विद्यार्थिनींनी शपथ घेतली. ही दुर्दैवी बाब आहे की, त्या मुलींच्या मनात भीतीचं किंवा संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे ते दूर करण्याची जबाबदारी शासनाची सुद्धा आहे. शिक्षकांची, आई -वडिलांची आणि समाजाची देखील ही जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थिनींना अशाप्रकारे शपथ दिली जाणं दुर्दैवी आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या.