आजच्या जगासमोर अनेक प्रकारची संकट आणि आव्हानं आहेत. जग नव्या बदलाच्या उंबरठय़ावर असताना भारतही राख झटकून जागा होत आहे. महासत्ता होण्याच्या उंबरठय़ावरील भारताकडे जग आशेने पाहत आहे. अशा वेळी जगाला एकत्र येऊन सर्वाच्या गरजा किमान सन्मानपूर्वक भागतील, अशी धोरणे आखावी लागणार आहेत. हा विचार घेऊन ‘जय भारत जय जगत’ व्याख्यानमालेतून अविनाश धर्माधिकारी हे त्यांच्या ओघवत्या शैलीतून जगासमोरील आव्हानांचा वेध घेत आहेत. माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांची व्याख्यानमाला पौड रस्त्यावरील एमआयटी शाळेच्या पटांगणावर सुरू आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असलेली ही व्याख्यानमाला रविवापर्यंत (३१ जानेवारी) सुरू राहणार आहे. ‘महासत्तांचा उदय, अस्त आणि उदय’ या विषयावर बोलताना भारतीय संस्कृती प्रतिक्रियावादी आणि द्वेषमूलक नाही तर सर्वसमावेशक आणि सर्वाचे सहअस्तित्व मान्य करणारी असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले. पर्यावरणाचा प्रश्न सोडविला नाही, तर मानवाचा विनाश अटळ आहे. हा धोका असला तरी भारत योग्य पावले टाकेल याविषयीचा आशावादही त्यांनी जागविला. भारत जागतिकीकरणातूनच महासत्तेकडे वाटचाल करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रशासनात गेल्यावर स्वच्छ आणि लोकाभिमुख काम करण्याचा संकल्प सोडला. अण्वस्त्रे आणि अणुविज्ञान हा विषय मांडताना त्यांनी अण्वस्त्रांचे दुष्परिणाम सांगितले.