कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील कळस चोरीला जाऊन सात दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. या प्रकरणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी लोणावळा येथे पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या अपयशाबद्दल खंत व्यक्त केली. राज्यातील मंदिरात होणाऱ्या चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच १५ दिवसांत या प्रकरणाचा छडा लागला नाही, तर दुसरा कळस बसवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील सोन्याचा मुलामा दिलेला पंचधातूचा कळस चोरीला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. सकाळी आठच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताला हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर मंदिर प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. मात्र, अद्याप पोलिसांना या घटनेतील आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तरे म्हणाले की, राज्यातील मंदिरातील चोरीच्या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यापूर्वी देखील अनेक वेळा कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला. ३० डिसेंबर २०११ ला एकविरा देवीच्या मंदिरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. सदर दरोड्याच्या प्रयत्नांतील दरोडेखोरांचा देखील अद्याप शोध लागलेला नाही. १५ दिवसांच्या आत कळस मिळाला नाही तर शासनाची निष्क्रियता समोर येईल. पोलीस तपासात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचे ट्रस्टने त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित होते. पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी म्हटले. मावळमध्येही गुन्हेगारी वृत्ती वाढली आहे, त्यांना राजकीय पाठबळ मिळते. हे रोखण्याची जबाबदारी राज्य शासनाची आणि गृहमंत्र्यांची आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.