‘सहज बोलता बोलता’मध्ये गुरुवारी किरण पुरंदरे यांच्याशी संवाद पुणे : दिवाळीच्या थंडीची चाहूल लागताच दरवर्षी पक्ष्यांचे स्थलांतर का होते, हजारो किलोमीटरचे अंतर पार करून पक्षी दरवर्षी त्याच ठिकाणी कसे येतात या प्रश्नांसह पक्षी विश्वाबद्दल अभ्यासपूर्ण माहितीचा खजिना खुला होणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांच्याशी होणाऱ्या संवादातून पक्षी विश्वाची सफर घडेल. हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी त्याच ठिकाणी दरवर्षी कसे येतात? पक्ष्यांचा आवाज म्हणजे केवळ सुमधुर गायन असते की दोन पक्ष्यांमधील संवाद? सिमेंटची जंगले झालेल्या शहरात पक्ष्यांचे अस्तित्व किती उरले आहे? एखाद्या पक्ष्याचे नाहीसे होणे म्हणजे काय? पक्षी विश्वाबद्दलच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीतून मिळू शकतील. वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन (५ नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन (१२ नोव्हेंबर) या दोन्ही पक्षीतज्ज्ञांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे औचित्य साधून ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’मध्ये पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांच्याशी गप्पांची मैफील आयोजित करण्यात आली आहे. देखणी दुनिया.. सगळेच पक्षी मोर नसतात. पण, प्रत्येक पक्ष्यामध्ये मोर नक्की असतो. त्याचे वेगळेपण, त्याच्या खास लकबी, त्याचे राहणे, खाणे हे सारे आपल्याला ठाऊक नसते. ते जाणून घेण्याची संधी किरण पुरंदरे यांच्याशी होणाऱ्या गप्पांच्या मैफिलीतून लाभणार आहे. पक्ष्यांच्या या अनोख्या, रंगीबेरंगी आणि देखण्या दुनियेचे पर्यटन ‘सहज बोलता बोलता’ कार्यक्रमात घडेल. सहभागासाठी : येथे नोंदणी आवश्यक.