*  नववी-दहावीचे पेपर शंभर गुणांचे
*  अकरावी-बारावीचेही काही घटक वगळले
नववी आणि दहावीच्या बीजगणित व भूमिती या विषयाची परीक्षा १५० गुणांवरून आता १०० गुणांची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नववी ते बारावीच्या काही विषयांतील घटक व उपघटक नव्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत.
अकरावी, बारावीच्या गणित आणि संख्याशास्त्र (कला आणि विज्ञान भाग १ व २) या विषयात आधी समाविष्ट असलेले आणि केंद्रीय बोर्डाच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमात नसलेले जास्तीचे अभ्यास घटक आता अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. देशपातळीवर अभियांत्रिकीसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा झाल्यास राज्यातील विद्यार्थ्यांना जास्तीचे घटक अभ्यासावे लागतात व त्यांच्या गुणानुक्रमावर परिणाम होतो. त्यामुळे हे अभ्यास घटक अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येत असल्याचे मंडळाने कळवले.
* दहावीच्या गणिताचे गुण ५०ने कमी होणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ११ मार्च २०१२ रोजीच दिले होते.