मुकुंद संगोराम

दिवाळीनंतर पुणेकरांना डोळ्यातल्या पाण्याचाच काय तो आधार असणार आहे! नाहीतरी गेली अनेक वर्षे सध्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून पुणेकरांना बोलणी खावी लागतच होती. हे पुणेकर फार म्हणजे फारच पाणी वापरतात. रोज मोटारी काय धुतात, इमारतींचे जिने काय धुवून काढतात, दिवसभर नळच काय सोडून ठेवतात, ताजे पाणी हवे म्हणून आदल्या दिवशी भरून ठेवलेले पाणी ओतून काय देतात.. अशी नाना मुक्ताफळे पुणेकर ऐकत आले आहेत. एके काळी पाण्याची श्रीमंती असलेल्या या शहराला आलेली ही अवकळा आणखी काळी होत जाणार आहे. एखाद्या शहराच्या परिसरात चार धरणे असावीत आणि त्यामध्ये दीड वर्षे पुरेल, एवढे पाणी साठण्याची व्यवस्था असावी आणि तरीही या शहराला धड पाणी मिळू नये, हे सत्ताधारी आणि प्रशासक यांचे नाकर्तेपण आहे.

पाटबंधारे खाते आणि महानगरपालिका यांचे नाते कायमच विळ्याभोपळ्याचे राहिले आहे. याचे कारण धरणांची मालकी पाटबंधारे खात्याकडे, पण त्यातील पाण्यावर सत्ताधाऱ्यांचा हक्क. त्यामुळे हवे तेवढे पाणी पाटबंधारे खात्याने सोडावे, असा त्यांचा हट्ट, तर गरजेपेक्षा कितीतरी अधिक पाणी देत असल्याचा पाटबंधारेचा दावा. हे दोन्ही खरे नाही, ही त्यातली खरी मेख. याचे कारण या दोघांनाही प्रत्यक्षात नेमके किती पाणी धरणातून सोडण्यात येते आणि किती पाणी पालिकेच्या शुद्धीकरण केंद्रात येऊन पोहोचते, याची अधिकृती माहिती नाही. हे सगळे अंदाजाने सुरू आहे. नव्या तंत्रज्ञानाची कास न धरता, पाटबंधारे म्हणते, एवढे पाणी दिले, पालिका म्हणते, एवढेच पाणी मिळाले. हे सगळे केवळ मनोरंजक आहे. पण त्याची शिक्षा मात्र समस्त पुणेकरांना भोगावी लागते आहे.

पुण्याजवळ असलेल्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून एकूण २९.१५ टीएमसी (एक टीएमसी म्हणजे साधारण २८ अब्ज लीटर)  एवढे पाणी साठवले जाते, असे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. या धरणांत मागील वर्षी २७.३२ टीएमसी पाणी साठले होते. यंदा तेथे असलेला पाणीसाठा २४.९४ एवढा आहे. या पाण्यापैकी पुण्याला १८ टीएमसी पाणी दिले जाते, असे सांगितले जाते. हे सगळे आकडे खरे असतील तर (खोटे असतील, याचे कारण या धरणांतील गाळ काढण्याचे प्रयत्न कधी झाले नाहीत. त्यामुळे त्यांची पाणी साठवण्याची क्षमता वर्षांनुवर्षे कमी होत आहे.) केवळ २.३८ टीएमसी एवढे पाणी कमी साठले, म्हणून वर्षभर एक वेळच पाणीपुरवठा करणे हे काही पटणारे नाही. पुण्यातील शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी घरापर्यंत येईपर्यंत चाळीस टक्के गळती होते, असे पालिकेचाच अहवाल सांगतो. याचा अर्थ ७.२ टीएमसी पाणी वाया जाते. हे जर खरे असेल, तर ही गळती थांबवण्याचे कोणते प्रयत्न आजवर झाले, हेही पालिकेने सांगायलाच हवे. पण याची उत्तरे पुणेकरांना ना पालिका देईल, ना पाटबंधारे खाते. या दोघांनाही हे सगळे आकडे लपवून ठेवण्यातच अधिक रस आहे.

पावसाळ्यात या चारही धरणांत इतके पाणी साठले, की पाटबंधारे खात्याने मुठा नदीत सुमारे वीस टीएमसी पाणी सोडून दिले. याचा अर्थ पुण्याला लागणाऱ्या वर्षभराच्या पाण्यापेक्षाही अधिक पाणी नदीत सोडून दिले. म्हणजे धरणांत पाणी साठवण्याची क्षमता नाही आणि पावसाळ्याच्या शेवटी पुरेसा पाऊस पडेल आणि धरणे पूर्ण भरतील, असा गाढव अंदाज पाटबंधारे खात्याने वर्तवला. तो खोटा ठरला. त्यामुळे आता पुणेकरांवर पाणीकपातीची वेळ आली आहे. या चार धरणांच्या साखळीत जर गरजेपेक्षा अधिक पाऊस पडत असेल, तर तेथे आणखी एक धरण बांधता येऊ शकते का? किंवा नदीतून सोडून देण्यात येणारे पाणी वाटेतच कुठे साठवून ठेवता येऊ शकते का? या प्रश्नांचा विचार पाटबंधारे खात्याला करता येत नाही, हे तर फारच भयंकर. पण या सगळ्या चुकांचे धनी मात्र पुणेकर आहेत.

जगातले सगळे प्रगत देश साठवून ठेवलेले पाणी पंधरा महिने पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करतात. आपणच एक असे महाशहाणे की पाण्याचे नियोजन केवळ नऊ महिन्यांसाठीच करतो. यंदाच्या उन्हाळ्यापासूनच पाण्याचे नियोजन नीट केले असते, तर पुढील वर्षांपर्यंत कपातीची वेळच आली नसती. आपणच कर्मदरिद्री. दुसरे काय?

mukund.sangoram@expressindia.com