ज्येष्ठ समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांचे मार्गदर्शन पुणे : सध्याच्या काळात नोकरी-रोजगारासाठी केवळ पदवी पुरेशी नाही, तर कामाचा अनुभव, संवादकौशल्य, संयम, ज्ञान अद्ययावत करत राहणे आवश्यक आहे. तसेच शिक्षणाबरोबरच चौफेर आकलनही आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांनी शनिवारी के ले. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या मालिके तील दुसऱ्या सत्रात ‘नोकरी आणि रोजगार संधींसाठी आवश्यक कौशल्ये आणि पदव्युत्तर शिक्षणाची दिशा’ या विषयावर डॉ. गीत यांच्याशी स्वाती के तकर यांनी संवाद साधला. लोकसत्ताचे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आयटीएम स्कील अॅकॅडमी आहेत. सत्रात मोठय़ा संख्येने सहभागी झालेल्या वाचकांनी पदव्युत्तर शिक्षणासाठीचे अभ्यासक्रम, रोजगार-नोकरीच्या संधी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतानाच डॉ. गीत यांनी नोकरीच्या बाजारातील वास्तवही मांडले. डॉ. गीत म्हणाले की, गेल्या तीस ते पस्तीस वर्षांत पुस्तकी शिक्षणावरच भर होता. त्यामुळे रोजगारक्षम पदवीधर तरुण मिळत नाहीत. पदवीच्या शिक्षणाबरोबरच पुस्तकी शिक्षणापलीकडे जाऊन विश्लेषणात्मक ज्ञान, त्याच्या मांडणीचे कौशल्य, प्रत्यक्ष कार्यानुभव महत्त्वाचा ठरतो. विद्यार्थ्यांकडे हे गुण नसल्यास ते रोजगारक्षम होणार नाहीत. त्याशिवाय प्रत्येकाला त्याच्या विद्याशाखेशी किंवा वेगळ्या शाखेतील काही ना काही कौशल्य शिक्षण गरजेचे आहे. कॅ म्पस प्लेसमेंटमधून मोठय़ा पगाराचे पॅके ज जेमतेम एक टक्के विद्यार्थ्यांना मिळते. हे विद्यार्थी महाविद्यालयातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांमधील, नामांकित महाविद्यालयातील असतात हे लक्षात घेतले पाहिजे. आज आंतरविद्याशाखीय शिक्षणाला महत्त्व आले आहे. वेगवेगळ्या शाखांचे किमान मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. नोकरीच्या संधीसाठी काही महत्त्वाच्या सूचनाही डॉ. गीत यांनी केल्या. ‘पारंपरिक शाखांमध्ये के वळ पदव्युत्तर पदवी घेऊन रोजगारक्षमता वाढत नाही, तर विद्यार्थ्यांनी आपला अनुभव, कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे. ज्या शाखेत काम करायची इच्छा आहे, त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती घ्यावी. वेगवेगळ्या लोकांना भेटून ते क्षेत्र समजून घेतले पाहिजे. मला येत नाही, माझ्या दर्जाचे काम नाही असे म्हणून चालणार नाही. मिळेल ते काम करण्याची तयारी असल्यास नवनव्या संधी मिळू शकतात. आपण काम करू इच्छित असलेल्या क्षेत्राचा सर्वसमावेशक विचार करायला हवा. दर पाच वर्षांनी प्रचंड प्रमाणात बदलणारे तंत्रज्ञान समजून घेतले पाहिजे,’ असे डॉ. गीत म्हणाले. येत्या काळात कार्यक्रम आयोजन (इव्हेंट मॅनेजमेंट), आरोग्यनिगा, सेवा पुरवठा, प्रवास पर्यटन (ट्रॅव्हल टूरिझम), आदरातिथ्य सेवा (हॉस्पिटॅलिटी) अशा काही क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात मागणी येणार आहे. मात्र, त्यासाठी संगणकाचा वापर, संवाद कौशल्य, त्या क्षेत्राची सर्वंकष माहिती असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. केवळ स्वप्नांत जगू नका.. : हल्ली आठवीपासूनचे विद्यार्थी परदेशी जाऊन शिकण्याचे, राहण्याचे स्वप्न पाहतात. पण हे स्वप्न जीआरईसारख्या परीक्षांतील गुणांवर अवलंबून आहे. अनेक अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, गैरसमज असतात. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांशी संबंधित अनेक क्षेत्रात संधी आहेत. त्या क्षेत्रांची माहिती घेऊन तयारी करणे आवश्यक आहे. विज्ञान शाखेत संशोधनाच्याही अनेक संधी आहेत, असे डॉ. गीत यांनी सांगितले. पदवीपूर्व शिक्षणसंधींबाबत आज मार्गदर्शन ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या मालिके त आज (२० सप्टेंबर) सकाळी ११ वाजता ‘करोनोत्तर काळातील विशेष वाव असलेल्या पदवीपूर्व शिक्षणसंधीचा आढावा’ या विषयावर विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे सहप्रायोजक आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी के ल्यावर आमच्याकडून तुम्हाला ई मेल आयडीवर संदेश येईल. त्याद्वारे दिलेल्या वेळेत या संवादात सहभागी होता येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी अचानकपणे नको! स्पर्धा परीक्षेसाठी पदवीसह गणित, तर्क, सामाज्ञ ज्ञान अशा विषयांची तयारी असावी लागते. यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांची पदवीनंतर अचानकपणे तयारी करण्यापेक्षा नोकरी करत तयारी करणे शक्य आहे. अफाट अभ्यास करूनही स्पर्धा परीक्षेत यश मिळतेच असेही नाही. पहिल्या प्रयत्नात यश मिळवणारे थोडेच असतात. सध्या पदवीधरांची संख्या प्रचंड वाढली असून, सरकारी नोकरीच्या बाबतीत नशिबात असेल तर मिळेल असे चित्र आहे, असेही डॉ. गीत यांनी सांगितले.