१८व्या महिन्यापासूनच मुलांना शाळेत दाखल करण्याची नवी टूम निघाली आहे. मोठय़ा ब्रँडेड शाळांमधून अवघ्या दीड वर्षांच्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. शाळेची सवय लागावी अशा जाहिरातबाजीने ही नवी संकल्पना खासगी नर्सरी शाळांकडून पालकांच्या गळी उतरवली जात आहे. याबाबत नागरिकांकडून आणि पालकांकडून विरोधाचाच सूर उमटताना दिसत आहे. ‘एवढय़ा लहान वयात कशाला हवी शाळा आणि अभ्यास,’ अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. खेळघरासारखी संकल्पना चालेल, मात्र एवढय़ा लहान वयात अभ्यासाचा बाऊ नको,’ असेही मत व्यक्त करण्यात येत आहे. ‘मुलांची शिकण्याची गोडी कमी होऊ शकेल’ ‘पूर्वनर्सरी शाळांची काहीही आवश्यकता नाही. लहान मुलांना त्यांच्या वयाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी घरीही शिकवता येतात. लहान मुलांना कडक वेळापत्रकांत अडकवले तर त्यांची शिकण्याची गोडीच कमी होऊ शकते. सध्याच्या सगळ्या शिक्षणपद्धतीतच बदल होण्याची आवश्यकता आहे. पुण्यात अपवाद वगळता शाळा शिक्षणाचे वातावरण जपणाऱ्या आहेत, असे वाटत नाही.’ - प्रीती मुळिक ‘मुलांमधील क्षमता साचेबद्ध करणे चुकीचे’ आपण लहान असताना बालवाडय़ा असायच्या. त्यातून शाळेची सवय लागतच होती. त्यानंतर पहिलीत अभ्यासक्रमाची ओळख व्हायची. त्या बालवाडय़ांमध्ये गाणी, गोष्टी, खेळ असायचे. मात्र पूर्व नर्सरीसारख्या संकल्पनेत लहान मुलांना गोष्टी शिकवण्याचा प्रकार चुकीचाच आहे. दीड वर्षांपासून अभ्यासाचे ओझे मुलांवर लादू नये. आताच्या मुलांमध्ये अधिक क्षमता आहेत हे बरोबर आहे, मात्र त्या साचेबद्ध करणे मुलांसाठीच घातक आहे. - डॉ. सायली शहा ‘सरकारनेच बंदी घालावी’ मुलांना पाचव्या वर्षांपर्यंत घरीच शिकवावे. दीड वर्षांच्या मुलाला व्यक्तही होता येत नाही. त्याच्या गरजा सांगता येत नाहीत; या वयात त्यांना शाळेच्या चौकटीत अडकवणे चुकीचे आहे. पालकांनीच या काळात मुलांना अनुभवातून बाहेरचे शिक्षण द्यावे. निसर्गाची ओळख करून द्यावी. शासनानेच कडक भूमिका घेऊन मुलांचे बालपण हिरावून घेणाऱ्या या प्रकारांवर बंदी आणावी.’ - राहुल उकाळे ‘पूर्वनर्सरी ही अनैसर्गिक संकल्पना’उ दीड वर्षांच्या मुलाला शाळेत दाखल करणे हे अनैसर्गिक आहे. या वयातील मुले नुकतीच चालायला आणि बोलायला लागलेली असतात. ती व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना आजूबाजूच्या गोष्टींबाबत कुतूहल असते. त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना लगेच हवी असतात, अशा वेळी शाळांमध्ये फक्त आपल्याकडे पूर्ण लक्ष दिले जात नाही असे या मुलांना जाणवते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. ही मुले व्यक्त होण्यास घाबरू शकतात. लहान मुलांच्या जेवणाचे आणि झोपण्याचे नैसर्गिक वेळापत्रक बिघडते. त्याचा त्रास पुढेही अनेक वर्षे होऊ शकतो. इतक्या लहान मुलांना शाळेत पाठवायचे तर व्हॅन, बसच्या माध्यमातून पाठवण्याचाच मार्ग स्वीकारावा लागणार. पुण्यातील सध्याचे वातावरण आणि शालेय वाहतुकीची परिस्थिती पाहता हे सुरक्षितही नाही. - चेतन एरंडे