कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड पुण्यातील लोणावळा येथील सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांची हत्या होऊन आज दोन महिने पूर्ण झाले. तरीदेखील आरोपी अद्यापही मोकाटच आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी का सापडत नाहीत, नातेवाईकांना याबाबत माहिती का दिली जात नाही, असे अनेक प्रश्न विचारले केले जात आहेत. सार्थक आणि श्रुती या दोघांचे मृतदेह लोणावळ्यातील भुशी धरणावरील डोंगरात ३ एप्रिलला आढळून आले होते. याला आज दोन महिने पूर्ण झाली आहेत. मात्र, आरोपींना जेरबंद करण्यास तपासयंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. लोणावळा पोलिसांनी या हत्येचा छडा लावण्यासाठी आठ तपासाच्या तुकड्या तयार केल्या होत्या. याशिवाय पाचशेहून अधिक नागरिकांची चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. सार्थक आणि श्रुती हे दोघेही सिंहगड महाविद्यालयात आभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते. त्यांचा मृतदेह लोणावळा येथे संशयास्पदरित्या आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. तसेच पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी याप्रकरणाचा तपास त्वरीत करावा, असे निर्देश दिले होते. या दुहेरी हत्येनंतर ज्या दुचाकीवरुन हे दोघे गेले होते ती दुचाकी सात ते आठ दिवसांनी पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र श्रुती आणि सार्थक यांच्या मोबाईलचा तपास अद्याप लागलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच याचा निषेध करण्यासाठी सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॅडल मार्च काढला होता. त्यावेळी लोणावळा पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर मयत सार्थक वाघचौरे याच्या नातेवाईकांनी लोणावळा पोलिसांची भेट घेत तपासाविषयी विचारणा केली. मात्र पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलीस याप्रकरणी गंभीर नसल्याचा आरोप सार्थकच्या चुलत्याने केला होता. तसेच हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावा अशी मागणी करत पोलिसांना त्यांनी निवेदन दिले होते. गेल्या महिन्यात सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर एसआयटी टीमची स्थापना करण्यात आली. मात्र या टीमलाही काहीच सुगावा लागला नाही.