महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी युतीबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुमकुवत असून, ते केव्हा पडेल यांचा नेम नाही. हे सरकार पडावं असा ध्यास प्रत्येकाला लागला आहे. जर हे सरकार पडलं, तर भाजपा चांगला पर्याय देईल, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी भाजपाच्या आगामी काळातील युतीबद्दल भाष्य केलं आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अमृता फडणवीस पुण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या,” जे नेते दिल्लीमध्ये आज भेटत आहेत, ते अगोदरपासून भेटत आले आहेत. अचानक भेटले नाहीत. त्यावरून लगेच निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. मात्र एक गोष्ट खरी आहे की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार खूप कुमकुवत आहे. हे सरकार केव्हा पडेल, असाच ध्यास प्रत्येकाला लागला आहे. जर हे सरकार पडले, तर भाजपा एक चांगला पर्याय देईल”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

याच मुद्द्याला धरून ‘भाजपा चांगला पर्याय देऊ शकते असं आपण म्हणता, पण भाजपा नेमकं कुणाला सोबत घेणार?’, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मी यासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निश्चित सांगेल”, असं उत्तर त्यांनी दिलं.

राज्यपालांसारखा माणूस मी पाहिला नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याला सरकारकडून विरोध होत असल्याच्या मुद्द्यावरही अमृता फडणवीसांनी भाष्य केलं. “राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा असून, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील. हा त्यांच्या मनात राग असेल, त्याबद्दल मला माहिती नाही. पण असे व्हायला नको”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.