पुण्यात सोमवारी भीमा-नीरा नदीजोड प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळून ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. भिगवण जवळील अकोले गावात नीरा भीमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्याचे बांधकाम सुरु होते. येथे १५० मीटर खोल बोगदा तयार करण्यात येत असून या बोगद्यातून बाहेर येताना क्रेन उलटली. त्यामुळे अपूर्णावस्थेत असणारे येथील बांधकाम कोसळले. अग्निशामन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले. बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम तावशी ते डाळज या २४ किलोमीटर अंतराच्या सहा टप्प्यात जलदगतीने सुरु आहे. नीरा नदीच्या तावशी येथून उजनी धरणाच्या डाळज पर्यंत बोगद्याद्वारे नदी जोड प्रकल्पाचे काम अकोले ,काझड, डाळज या ठिकाणी तीन ठिकाणी सुरु आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर शॉफ्ट खोदून बोगद्याच्या खोदाई सुरु असून या ठिकाणी जमिनीवरून सुमारे शंभर फूट खोल खाली खोदकाम करून बोगद्याद्वारे आत मध्ये मशीनच्या साहाय्याने खोदाई सुरु आहे. या कामासाठी तीनशे कामगार काम करीत असून जेसीबी मशीन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या मदतीने काम सुरु आहे. २०१२ मध्ये या कामाची सुरुवात करण्यात आली. या नदीजोड प्रकल्पामुळे भीमा आणि नीरा नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार होते. मात्र, सरकारकडून निधी मिळत नसल्याने मध्यंतरी दोन वर्षे काम बंद होते. तावशी ते डाळजपर्यंत सोमा आणि मोहिते या कंपनीच्या वतीने काम सुरु आहे.या नीरा भीमा नदी स्थिरीकरण जोड बोगदा प्रकल्पाचा मुख्य हेतू नीरा नदीतून येणारे पाणी उजनी धरणात वळवून उस्मानाबाद, सोलापूर या पुणे या जिल्ह्यातील शेतीला आणी लोकांना या पाण्याचा त्याचा उपयोग करून देण्यात येणार आहे.