मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. संभाजीराजे सध्या राज्यभर दौरे करत असून, विविध पक्षांच्या नेत्यांच्याही भेटी घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे भाजपाला दूर ठेवत असल्याचं आणि भाजपाकडून त्यांच्यावर टीका होत असल्याचं दिसत आहे. संभाजीराजेंनी खासदाराकीचा राजीनामा देण्याचाही इशारा दिलेला आहे. संभाजीराजेंच्या राजीनाम्याच्या इशाऱ्यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सकाळी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा-ओबीसी आक्षरण, संभाजीराजेंची भूमिका, देवेंद्र फडणवीस-शरद पवार यांच्या भेटीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “शरद पवार आजारी आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस भेटायला होते. पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले. त्यामध्ये राजकीय काहीही नव्हतं. त्यानंतर ते जळगावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत,” असं उत्तर देत पाटील यांनी फडणवीस-खडसे भेटीवर अधिकचं भाष्य करणं टाळलं.

“मराठा आरक्षणप्रश्नी दिल्ली दरवाजावरील ही धडकच निर्णायक ठरेल”

संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला कृती कार्यक्रमासाठी ६ जूनपर्यंतची मुदत देतानाच खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. त्यावर पाटील म्हणाले, “तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, पण खासदार छत्रपती संभाजीराजेंनी राजीनामा दिल्याने कुणावर परिणाम होणार आहे?, मला कळत नाही. महाराष्ट्रातील सरकार हे कोडगं सरकार आहे. संभाजीराजेंवर हेरगिरी सुरू आहे, त्याचा मी निषेध करतो,” असं पाटील म्हणाले.

“…अन्यथा कोविड-बिविड काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल!”

आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात केल्या करोना नियमांच्या उल्लंघनावर पाटील यांनी भाष्य केलं. “आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढली. गर्दी जमवली, हे चुकीचे आहे. महेश लांडगे यांना समज देण्यात येईल,” असं सांगत पाटील म्हणाले, “ओबीसी आरक्षणाच्या निर्णयात केंद्र सरकारचा काय संबध आहे. राज्य सरकारने दीड वर्षांपासून मागासवर्गीय आयोग नेमला नाही, त्यांनी तो आधी नेमावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघा म्हणूनही पंतप्रधान मोदींना पत्र लिहितील,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.