भिशीतून घेतलेल्या राणीहाराबाबत व पैशाच्या कारणावरून सततच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आंबेगावातील गणेश व्हिला सोसायटीत मंगळवारी ही घटना घडली. विद्या नरेश कांबळे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिची आई विजया तांबे (वय ४९, रा. धारावी, मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून विद्या यांचा पती नरेश अशोक कांबळे (रा. गणेश व्हिला सोसायटी, आंबेगाव, धनकवडी) याच्यासह कुंटुंबातील चौघांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या व नरेश यांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला आठ वर्षे व दीड वर्षे वयाची दोन मुले आहेत.  नरेश याला दिलेल्या २० ते २२ लाख रुपयांबाबत विद्याचे सासरे तिला सातत्याने हिशेब मागत होते. त्याचप्रमाणे विद्याने भिशीतील पैशातून स्वत:साठी राणीहार घेतला होता. या दागिन्याबाबतही तिच्याकडे सातत्याने विचारणा करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. त्या छळाला कंटाळून तिने स्वयंपाकगृहात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.