महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालात माहिती

जिल्ह्यमध्ये सुमारे १०८९ अंगणवाडय़ांची संख्या आहे. यापकी ९६४ अंगणवाडय़ांना गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी इमारती बांधून दिल्या आहेत. परंतु एक वेळ इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर त्या इमारती दुरुस्तीच्या दृष्टीने निधी उपलब्ध नाही. परिणामी ५८९ इमारतींची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे,  तर ६१ नवीन इमारत बांधकामाची गरज आहे. इतकेच नाही तर ३५४ ठिकाणी शौचालय बांधकामे नाहीत. प्रत्यक्षात असा अहवाल महिला व बाल कल्याण विभागांनीच प्रशासनाला दिला असल्याने मोडकळीस आलेल्या अंगणवाडय़ांची माहिती समोर आली आहे. इमारत दुरुस्तीला निधी केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागामध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देऊन मुलांना मूळ शिक्षण प्रवाहात आणण्यास मदत करणाऱ्या ५८९ अंगणवाडय़ांच्या इमारतीची दुरवस्था झाली असून त्या मोडकळीस आल्या आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याकडे लक्ष दिले जात नाही. गेल्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी अंगणवाडय़ांच्या इमारतींचे बांधकाम झाले होते. अंगणवाडय़ा मोडकळीस आल्याची तक्रार सुरू झाल्याने महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यत अंगणवाडीनिहाय केलेल्या सर्वेक्षणात हा प्रकार पुढे आला आहे. वसमतमधील १८०, कळमनुरीतील ३०, आखाडाबाळापूर २८, औंढा नागनाथमधील १७४, सेनगाव ११३, हिंगोली ६४ अंगणवाडय़ांची दुरवस्था झाली आहे. औंढा नागनाथ व वसमत तालुक्यातील अंगणवाडय़ा इमारतीची स्थिती अत्यंत बिकट आहे. इमारत दुरुस्तीसाठी प्रत्येकी किमान एक लाखाचा निधी मागितला तरीही ५.८९ कोटी दुरुस्तीस लागणार आहेत. तसा प्रस्तावही जिल्हा नियोजन समितीकडे पूर्वीच देण्यात आलेला आहे, तर किमान ६१ ठिकाणी नवीन अंगणवाडी इमारत बांधकामांची गरज आहे, तर जिल्ह्यत ७३ ठिकाणी नवीन अंगणवाडय़ांची  आवश्यकता असताना बारा ठिकाणी जागा उपलब्ध नाही. जागा असलेल्या हिंगोलीतील – ४, सेनगावात ८, वसमतमध्ये १७, कळमनुरीत ६, औंढा नागनाथमध्ये ९, तर आखाडाबाळापूर प्रकल्पातील १७ अंगणवाडी बांधकामांसाठी प्रत्येकी ८.५० लाख याप्रमाणे ५.१८ कोटींचा निधी लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी नवीन अंगणवाडय़ा बांधकामासाठी निधी दिला असतांना इमारत बांधकामाकडे मात्र कंत्राटदाराने पाठ फिरवली होती.

३५४ इमारतीत शौचालयच नाहीत

अंगणवाडीमध्ये येणाऱ्या लहान मुलांना तितकी समज नसते. त्यामुळे या वयातील मुलांना शौचास घेऊन जाण्याची जबाबदारी अंगणवाडी कार्यकर्तीवर असते. परंतु ३५४ इमारतींमध्ये शौचालय नाहीत. यामध्ये कळमनुरीतील ३६, वसमतमधील २४, औंढा नागनाथमध्ये १७७, सेनगावात २४, हिंगोलीत ५१, तर आखाडाबाळापूर प्रकल्पात ४२ अंगणवाडय़ात शौचालय बांधकाम झाले नाही. औंढा नागनाथ तालुक्यात ४० शौचालय बांधकामास प्रत्येकी चाळीस हजार याप्रमाणे निधीची मागणी नोंदवण्यात आली आहे.