आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. सध्या त्यांची पुण्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. १९ ते २१ जुलै असा तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. राज संवाद उपक्रमाअंतर्गत ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये ५० जणांचा समावेश असणार आहे. हे पथक पुणे शहरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हे पथक काम करणार आहे.

पावसामुळे होणाऱ्या किंवा इमारत दुर्घटनेसारख्या घटनांमुळे नागरिकाच्या मदतीसाठी महाराष्ट्र निर्माण सेना धावून जाणार आहे. मनसेने पुण्यात आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. या यावेळी मनसे नेते हेमंत संभूस यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आपात्कालीन व्यवस्थापन पथका बद्दल हेमंत संभूस म्हणाले की, “पावसाळ्याच्या दिवसात शहरात अनेक ठिकाणी घरात पाणी जाण्याच्या घटना घडतात. तर कुठे घरे किंवा इमारतीचा भाग पडल्याच्या घटना घडतात. तेव्हा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आप

त्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्या बद्दल राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावर त्यांनी पथक स्थापन करण्यास परवानगी देताच, आम्ही ५० जणांचे पथक तयार केले. आता यापुढे महापालिका आणि पोलिस आयुक्त यांच्याशी पुढील चर्चा करून शहरात सेवेसाठी आमचं पथक सज्ज राहणार आहे. मात्र शहरातील नागरिकांना कोणत्याही दुर्घटनांना सामोरे जावे लागू नये, हीच आमची अपेक्षा आहे,” असे त्यांनी सांगितले.

या पथकातील सदस्या श्रुती कुलकर्णी म्हणाल्या की, “मी आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रशिक्षण घेतले असून कोणत्या परिस्थिती संबधित नागरिकाला कसे बाहेर काढायचे या बाबत सर्व सहकाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे. तसेच आमच्या पथकात सध्या ५० जण आहेत. पुणे शहरात या आपत्ती व्यवस्थापन पथकात किमान ५०० जणांचा समावेश करू आणि त्यांना नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर करु.”