राज्यसेवा पूर्वपरीक्षा शांततेत झाली असली तरी या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांनी उमेदवारांचे मनोरंजन केले आहे. प्रश्नपत्रिकेतील भाषांतराच्या चुकांमुळे अनेक प्रश्न संदिग्ध असल्याची तक्रारही उमेदवारांकडून करण्यात येत आहे. ‘रामायणातील सीतेला कोणत्या हरणाने भुरळ पाडली?’ यासारखा प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आला होता. राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी झाली. या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांनी उमेदवारांचे मनोरंजन केले आणि त्यांना गोंधळातही टाकले. अनेक प्रश्नांमधून आयोगाला नेमके काय तपासायचे आहे, हेच कळत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रश्न संदिग्ध होते. भाषांतरातील चुकांमुळे प्रश्न स्पष्ट होत नव्हते, असाही उमेदवारांचा आक्षेप आहे. ‘पुढील वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे करा’ पर्याय अ. भारतीय औद्योगिक विकास बँक (आयडीबीआय), ब. भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक (आयआयबीआय), क. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (आयसीआयसीआय), ड. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ (आयएफसीआय), असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र ‘स्थापना झाल्याप्रमाणे’ यामध्ये संदिग्धता असल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला आहे. याबाबत ‘द युनिक अॅकॅडमी’चे तुकाराम जाधव यांनी सांगितले, ‘आयोगाने प्रश्नपत्रिकांचे भाषांतर अधिक काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मुद्रितशोधनही नीट केले जात नाही. उमेदवारांची एकेका गुणासाठी लढाई असते, मात्र संदिग्ध प्रश्नांमुळे उमेदवारांचे नुकसान होऊ शकते.’आयोगाने पूर्वपरीक्षेची प्राथमिक उत्तरसूची जाहीर केली असून, त्यावर २० एप्रिलपर्यंत आक्षेप पाठवायचे आहेत. दोन्ही प्रश्नपत्रिकांवरील आक्षेप एकाच पाकिटात मात्र स्वतंत्रपणे लिहून पाठवावीत असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर ही उत्तरसूची उपलब्ध आहे. काही नमुने.. * कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती? अ. कस्तुरी मृग, ब. काळवीट, क. चितळ, ड. चिंकारा * पुढील पुरुष किंवा महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत त्यातील कोण डावखोरे नाहीत/ नव्हते? १. बराक ओबामा, २. बिल क्लिंटन, ३. महात्मा गांधी, ४. नरेंद्र मोदी, ५. बिल गेट्स, ६. टॉम क्रुझ, ७. मर्लिन मन्रो, ८. अँजेलिना ज्योली, ९. अमिताभ बच्चन, १०. सचिन तेंडुलकर पर्याय : १. महात्मा गांधी, २. नरेंद्र मोदी, ३. अमिताभ बच्चन, ४. वरीलपकी कोणीही नाही * आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपटय़ाच्या पानांच्या ऐवजी कांचनाची पाने अधिक दिली जातात. आपटय़ाच्या पानांपेक्षा कांचनाची पाने अ. आकाराने लहान असतात, ब. स्पर्शास रूक्ष असतात वरील कोणते/ कोणती विधान योग्य आहे? १. फक्त अ , २. फक्त ब, ३. दोन्ही अ आणि ब, ४. दोन्ही नाहीत