महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आयोगाने बदलले असून आता भाषेची परीक्षा बहुपर्यायी आणि दीघरेत्तरी अशी मिश्र स्वरूपाची असणार आहे. भाषेचे गुण अंतिम निकालातही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उणे मूल्यांकनही केले जाणार आहे.
उत्तरपत्रिकांची तपासणी लवकरात लवकर होऊन वेळेवर निकाल जाहीर करणे शक्य व्हावे, त्याचप्रमाणे बहुपर्यायी स्वरूपामुळे मूल्यमापनातही अधिक पारदर्शकता आणण्याच्या हेतूने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचे आयोगाच्या विचाराधीन होते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असावे याबाबत आयोगाने विद्यार्थी, शिक्षकांनाच विचारार्थ पर्याय देऊन सूचना मागवल्या होत्या.
नव्या स्वरूपानुसार भाषा विषयांची परीक्षा दोन भागांत घेण्यात येणार आहे. पहिल्या भागांत मराठी आणि इंग्रजीचे प्रत्येकी ५० गुणांचे दीघरेत्तरी प्रश्न विचारण्यात येतील. त्यामध्ये निबंध लेखन, सारांश लेखन, भाषांतर यांचा समावेश आहे. दुसऱ्या भागांत दोन्ही भाषांचे प्रत्येकी ५० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. शंभर गुणांच्या या प्रश्नपत्रिकेत १ ते ५० क्रमांकाचे प्रश्न हे मराठी भाषेचे, तर ५१ ते १०० क्रमांकाचे प्रश्न हे इंग्रजी भाषेचे असणार आहेत. व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, शब्दांचा उगम, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, विरामचिन्हे, शब्दार्थ यांवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार आहेत. बहुपर्यायी प्रश्नांसाठी उणे मूल्यांकनही (निगेटिव्ह मार्किंग) राहणार असून तीन चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण कमी होणार आहे. भाषेचे एकूण २०० गुण अंतिम गुणांमध्येही ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये नव्या स्वरूपातील प्रश्नपत्रिका असणार आहे.

नवे काय?
* भाषेची एकूण २०० गुणांची परीक्षा
* शंभर गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका, प्रत्येकासाठी ३ तास वेळ
* पहिली प्रश्नपत्रिका दीघरेत्तरी, दुसरी बहुपर्यायी
* प्रत्येक प्रश्नपत्रिकेत मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी प्रत्येकी पन्नास गुणांचे प्रश्न
* मराठी आणि इंग्रजी भाषेच्या सामाईक प्रश्नपत्रिका
* दीघरेत्तरी प्रश्नपत्रिकेत दोन्ही भाषांसाठी निबंध लेखन २५ गुण, भाषांतर १५ गुण आणि सारांश लेखन, १० गुण
* बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेत दोन्ही भाषांचे प्रत्येकी ५० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला १ गुण
* बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेसाठी उणे मूल्यांकन, तीन चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण वजा
* भाषेचे गुण अंतिम गुणांत ग्राह्य़ धरणार