करोनामुळे तिन्ही ऋतूतील पर्यटनाला ब्रेकच लागला आहे. करोनामुळे सातत्यानं निर्बंध लागू केले जात असून, नागरिकांच्या बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहे. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर सरकारने निर्बंध लागू केले. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं निर्बंध शिथिल केले जात असून, लोक बाहेर पडताना दिसत आहे. पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यात तर पर्यटकांना करोनाचा विसर पडल्याचं दृश्यं दिसून आली. भुशी डॅमच्या दिशने जाणाऱ्या हजारो नागरिकांना लोणावळा पोलिसांनी परत पाठवले आहे. करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठी पंचस्तरीय धोरण अंवलंबलं आहे. रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्ही रेट कमी झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले असून, मुंबई-पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी ई-पासची अट रद्द झाली. निर्बंध शिथिल होत असतानाच पावसाचं आगमन झालं. त्यामुळे घरात असलेल्या मुंबई-पुण्यातील नागरिकांनी वर्षा पर्यटनासाठी लोणावळा, भूशी डॅमकडे कूच केली. सुट्टी असल्याने नागरिकांनी करोनाचं भान न बाळगता लोणावळा आणि भूशी डॅम परिसरात गर्दी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नियमांचं उल्लंघन करून लोक लोणावळा आणि भूशी डॅम परिसरात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळ पासूनच हजारो पर्यटक हे लोणावळ्यातील भुशी धरणाऱ्या दिशने जात असताना लोणावळा पोलिसांनी आवाहन, विनंती करून परत पाठवले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. अद्याप करोनामुळे पर्यटनस्थळावरील बंदी हटवण्यात आली नाही. मात्र याचा विसर पर्यटकांना पडला असून, हजारोच्या संख्येने पर्यटक हे लोणावळ्यात दाखल होत आहेत. पर्यटनस्थळच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वाहतूक कोंडी झाली. ती सोडवत असताना पोलिसांचा कस लागला. दुपारी चारपर्यंत हे दृश्य असंच होतं, अशी माहिती पवार यांनी दिली आहे. अद्याप करोना आटोक्यात आला नाही त्यामुळे पर्यटनस्थळी नागरिकांनी येऊ नये, असे वाहन लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केलं आहे.