राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचं पुण्यात निधन झालं. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कांचन यांच्या दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. १९८९ मध्ये आलेला स्मिता तळवलकर निर्मित आणि कांचन नायक दिग्दर्शित ‘कळत नकळत’ चित्रपट खूप गाजला. कळत नकळत आणि विश्वनाथ एक शिंपी या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले. गेली साडेचार दशकं ते दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत होते. जब्बार पटेल, राजदत्त, प्रभाकर नायक, दिनकर डी पाटील यांच्यासोबतही त्यांनी काम केलं होतं. चित्रपटांसोबतच त्यांनी मालिका व माहितीपटांचंही दिग्दर्शन केलं.