देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता येण्यापूर्वी तरूणांना दरवर्षी २ कोटी रोजगार दिले जातील, असे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले होते. मात्र सत्तेवर येताच या आश्वासनाचा सत्ताधारी भाजपाला विसर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. असा आरोप करता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर मोर्चा काढत कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. शिवाय यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. उद्योग आणि रोजगारात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. राज्य सरकारच्या मुद्रा योजनेसारख्या अनेक योजना फसव्या ठरल्या आहेत. यामुळे तरूणांच्या बेरोजगारीत वाढ झाली आहे. त्याच्या निषेधार्थ आज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर टाळे ठोकले आहे. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात मंत्र्यांना रस्त्यावर फिरकू देणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.