नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे. तसं एक पत्रकही सध्या चर्चेत आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हे पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये देण्यात आलेला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “ नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधातील आहे आणि व्यवस्थेच्या विरोधात जी लोकं काम करतात त्यांनी अन्य लोकांना तुम्ही आमच्यात या, संघर्ष करा असे सांगणे म्हणजे एक प्रकारे देशाच्या व्यवस्थेला आव्हान देण्यासारखेच आहे किंवा धोका निर्माण करण्यासारखंचआहे. त्यामुळे त्यांच्या आव्हानाचा फार विचार करण्याची गरज नाही. बाकी आपल्या लोकशाही राज्यात राज्यघटना, सरकार, न्यायालय या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवले जात आहेत.”

नक्षलवादी चळवळीकडून मराठा समाजातील तरुणांना त्यांच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी आज मत मांडलं आहे.

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा

तर, “मराठा समाजातील मूठभर दलाल, भांडवलदार मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळय़ांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्याकरिता मैदानात उतरावे. भारतीय क्रांतीचा विजय करण्याकरिता क्रांतीला अभिप्रेत असलेल्या विचारांनी आपली ताकद मजबूत करा. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत असून तुमची वाट पाहत आहे.”, असे म्हणत माओवादी राज्य समिती सचिव सहय़ाद्री याने मराठा आरक्षणाला नक्षलींचा पाठिंबा असल्याचे म्हटलेले आहे.

मराठा आरक्षण : नक्षलवाद्यांना छत्रपती संभाजीराजेंनी केलं आवाहन; म्हणाले…

यावर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. “नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात.” असं त्यांनी आवाहन केलेलं आहे.