अधिवेशनाच्या काळातच सिंचन प्रकल्पाच्या घोटाळ्याबाबत सरकारकडून चौकशी करण्यात येत असल्याच्या बातम्या किंवा त्यावर चर्चा रंगवल्या जातात. ही भाजपाची राजकीय खेळी असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा समितीकडून आयोजित एकदिवसीय 'निर्धार विजयाचा, लक्ष 2019' हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी माजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, केंद्रातील आणि राज्यातील सरकार विकास करण्यात अपयशी ठरल्याने अनेक मुद्दे पुढे आणले जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. याला नागरिकांनी बळी पडता कामा नये. राज्यात दुष्काळ असताना यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मात्र हे सरकार काही करताना दिसत नाही. या सरकारमधील एक मंत्री शेतकर्यांना जनावरे नातेवाईकांकडे सोडा, असा सल्ला देतात. यातून या सरकारची मानसिकता दिसते, अशा शब्दांत त्यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यामधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून पाण्याचे नियोजन करण्यात पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. पाणी टंचाईला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.