बुधवारी रात्रीपासून पुणे शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शहरातील अनेक रहिवासी भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुण्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन आता राजकारण सुरु झालं असून बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. दोन वर्षापुर्वी कात्रज येथील संरक्षक भिंत कोसळली होती. त्यावर कोणत्याही प्रकाराच्या उपाय योजना, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आजच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाला भाजप जबाबदार असून आता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून उद्या मार्गदर्शन घेणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे सांगितले.

कात्रज परिसरातील विश्वकर्मा नगर येथे पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. त्यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आदी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पुणे शहरात दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे कात्रज येथील संरक्षक भिंत कोसळली होती. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावर उपयोजना करण्यासाठी महापौर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात वेळोवेळी मांडली.”

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीकडे महापालिकेत सत्ताधारी भाजपाने नेहमी दुर्लक्ष केलं. सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळेच पुण्यातील नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीत या प्रश्नावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन सुळे यांनी दिलं.