पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रत्येक निवडणुकीपूर्वी अखेरच्या वर्षात राम मंदिर आणि हजच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेले. यंदा देखील तीच परंपरा त्यांनी कायम राखली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यासाठीच सध्या स्वच्छता अभियान राबवण्याची गरज आहे, अशा शब्दांत गुजरातमधील तरुण आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली.

भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज पुण्यात शनिवार वाड्यावर झालेल्या ‘एल्गार परिषदे’त मेवानी बोलत होते. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, राधिका वेमुला (रोहीत वेमुलाची आई), जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद, उल्काताई महाजन, सोनी सोरी, अब्दुल हमिद अजहर हे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणांतून या सर्वांनी भाजप सरकारच्या कार्यपध्द्तीवर सडकून टीका केली.

मेवानी म्हणाले, यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ने १५० जागा येतील असा अंदाज बांधला होता. मात्र, तो त्यांचा केवळ अंदाजच राहिला असून त्यांना प्रत्यक्षात ९९ जागा मिळाल्या. हे तेथील जनतेने त्यांच्या विरोधात केलेल्या मतदानामुळे शक्य झाले. आता २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घरी पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्र आल्यास तेव्हा देखील त्यांना दोन अंकीच जागा मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी सर्व विरोधकांनी एकाच व्यासपीठावर येण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गुजरात निवडणुकीत इतर राज्यातील भाजप आमदारांपासून देशाच्या पंतप्रधानांना किती वेळा सभा घेण्याचे वेळ आली. तेव्हा मला वाटले मी काय मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीसाठी उभा आहे का? अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.