पूना नाइट हायस्कूलमध्ये पालक आणि मुलांचे सहशिक्षण शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असली की वयाचा अडसर येत नाही, याचा प्रत्यय सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाइट हायस्कूल शाळेत मिळत आहे. या शाळेतील ‘आठवी अ’ ही तुकडी वैशिष्टय़पूर्ण आहे, कारण या तुकडीत पालक आणि विद्यार्थी अशा दोन जोडय़ा एकत्र शिक्षण घेत आहेत. अडचणींमुळे सुटलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालकांनी ‘स्कूल चले हम’ म्हणत प्रवेश घेत, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. बँकेत सफाई कर्मचारी असलेल्या शीतल लोंढे यांनी राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आठवीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी राजेंद्रनगरच्या वसंतराव वैद्य शाळेतून आठवीनंतर २००४ मध्ये शिक्षण सोडले होते. मात्र, बँकेत पदोन्नतीचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी पुन्हा शिक्षणाची कास धरली. विशेष म्हणजे, शीतल यांचा मुलगा अरण्येश्वर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीत शिकत आहे. ‘शिक्षण नसल्याने मला बढती मिळू शकत नव्हती. त्यामुळे स्वतसाठी शिकण्याचे ठरवून शाळेत प्रवेश घेतला. आता शाळेचे शिक्षण पूर्ण करतानाच बँकेत बढती मिळवण्याचे स्वप्न आहे,’असे शीतल यांनी सांगितले. शीतल यांचे वडील वामन बाप्पू लोंढेही बँकेत सफाई कर्मचारी आहेत. त्यांना निवृत्तीला अद्याप चार वर्षे बाकी आहेत. त्यांचे शिक्षण १९७५मध्ये सुटले होते. मुलीला रात्रशाळेत सोडायला जाताना त्यांनीही उत्साहाने शाळेत प्रवेश घेतला. ‘माझा नोकरीचा थोडाच काळ राहिला आहे. मात्र, तोपर्यंत दहावी उत्तीर्ण झालो, तर किमान शिपाई म्हणून निवृत्त होऊ शकेन. माझ्या मुलीचे वय लहान आहे. त्यामुळे ती आयुष्यात खूप काही करू शकते. शिक्षणानुसार तिला बढती मिळून ती बँकेत चांगल्या पदावरही काम करू शकेल. एवढय़ा वर्षांनी शाळेत जाताना, मुलीबरोबर पुन्हा शिकण्यातील भावना शब्दांत सांगता येण्यासारखी नाही. आता मला थोडे थोडे इंग्रजीही येऊ लागले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पुन्हा शिकण्यातील आनंद व्यक्त केला. कावेरी विजय भास्कर यांनी कौटुंबिक अडचणींमुळे १९९०मध्ये शिक्षण सोडले. त्यांचा मुलगा प्रथम हा आतापर्यंत विशेष मुलांच्या शाळेत शिकत होता. मात्र, त्याच्यात सुधारणा झाल्यानंतर त्याच्या प्रवेशाची माहिती घेण्यासाठी शाळेत गेल्या. त्या वेळी आपणही प्रवेश घ्यावा असे त्यांना वाटले आणि चौकशी केल्यावर आपल्यालाही प्रवेश मिळू शकतो असे त्यांना कळले. मग त्यांनी शिक्षणाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला. ‘इतक्या वर्षांनी शाळेत पुन्हा आल्यावर आनंद वाटतो आहे. दिवसभर यंत्र कार्यशाळेत काम केल्यावर आम्ही दोघेही रात्री शाळेत येतो. राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी माझ्या पतींनी प्रोत्साहन दिले. आता दहावी पूर्ण करून वाणिज्य शाखेत शिक्षण घेण्याचा विचार आहे,’ अशी भावना कावेरी यांनी व्यक्त केली. रात्रशाळेत शिकण्यासाठी वयाची अट नसते हे त्यांना समजावले. त्यांची शिकण्याची इच्छा असल्याने त्यांच्यासमोर असलेल्या आर्थिक अडचणी सोडवल्या. हे दोन्ही पालक आणि विद्यार्थी नक्कीच प्रेरणादायी आहेत. शिक्षणामुळे ते त्यांच्या इच्छा, स्वप्ने पूर्ण करू शकतील. - अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाइट हायस्कूल