केंद्र सरकारने मुस्लीम समाजातील महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे. या पार्श्वभूमीवर तिहेरी तलाक विरोधी कायदा केला. या कायद्याचे मुस्लीम समाजातून स्वागत देखील करण्यात आले. एवढेच नाहीतर या कायद्यानंतर तिहेरी तलाक प्रथेस चाप बसेल, अशी शक्यता होती. मात्र अशा घटना समाजात अद्यापही घडत असून पुण्यातील एका उच्चशिक्षित मुस्लीम महिलेसोबत निकाह, तलाक, हलाला, निकाह व पुन्हा तलाक अशी घटना घडली आहे. या घटनेमुळे मुस्लीम महिलांचे हाल काही संपेना असंच म्हणण्याची वेळ आली आहे. या घटनेला मुस्लीम सत्यशोधक मंडळाने वाचा फोडण्याचे काम केले आहे. या प्रकरणी सरकारने मला न्याय द्यावा, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. या घटनेतील पीडित महिलेशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, "माझा प्रेम विवाह असल्याने, घरातून लग्नाला विरोध होता. पण तरी देखील आम्ही लग्न केले. मी एका ठिकाणी लेक्चरर आहे तर, पती आयटी कंपनीत आहेत. आमच्या दोघांमध्ये सुरुवातीचा काही काळ सर्व ठिकठाक सुरू होते. मात्र त्यानंतर पतीने मला त्रास देण्यास सुरुवात केली. एवढच नाहीतर त्यांच्या घरातील सर्वांनी सांगितले की, आता त्याचं आम्ही दुसरं लग्न करणार आहोत. मी घरातील सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण माझे कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. अखेर पतीने मला तिहेरी तलाक दिला. यावेळी माझ्या पाठीशी कोणीही उभे राहिले नाही. अखेर मी पोलीस विभागातील भरोसा सेलकडे याप्रकरणी तक्रार दिली." "हे पाहिल्यानंतर माझ्या पतीच्या लक्षात आले की, आपल्या विरोधात तक्रार दिल्याने आपल्यावर कारवाई होऊ शकते. तेव्हा भरोसा सेल मार्फत आमच्या दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली. पण पत्नीला पुन्हा स्वीकारायचे म्हटल्यावर प्रथेप्रमाणे, हलाल करण्यात आले. पुन्हा माझा पतीसोबत निकाह करण्यात आला. मात्र पतीच्या मनात माझ्या बद्दल राग असल्याने, मला न सांगता तो घरातून निघून गेला. त्यावेळी लॉकडाउन सुरू असल्याने माझ्याकडे पैसेही उरले नव्हते, त्यामुळे मला घरभाडेदेखील देणे शक्य झाले नाही. त्याच दरम्यान मला पतीकडून तलाकबाबत एक नोटीस आली. आमच्यातील शरीयत कायद्याप्रमाणे, आणखी दर महिन्याला अशा दोन नोटिसा पाठवल्यावर ते तलाक घेऊन, दुसर लग्न करू शकतात. मात्र, मला पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले असून ते चुकीचे आहेत." मला तलाक नको असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, "या सर्व काळात मला खूप मानसिक त्रास झाला असून मला न्याय मिळाला पाहिजे. या मागणीसाठी मी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना भेटून आजवर झालेल्या घटनांची त्यांना माहिती दिली आहे. आता हे सर्वजण माझ्या पाठीशी आहेत. माझ्यासारख्या अनेक महिलांबरोबर अशा घटना घडत आहेत." त्या पार्श्वभूमीवर सरकारने मला न्याय द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. यावेळी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी म्हणाले की, "केंद्र सरकारने तिहेरी तलाक विरोधी कायद्या केल्यावर मुस्लीम समाजातील अशा घटना रोखल्या जातील अशी शक्यता होती. मात्र पुण्यात निकाह, तलाक, हलाला, निकाह आणि पुन्हा तलाक अशी घटना घडली आहे. यामुळे पीडित महिलेस मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेला तिहेरी तलाक विरोधी कायदा हा महिलांना संपूर्ण संरक्षण देणार नाही. या पार्श्वभूमीवर दुसरं लग्न आणि हलालासारख्या प्रथेवर बंदी घालावी. तसेच न्यायालयाबाहेर तलाक होता कामा नये. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, दुसर लग्न होता कामा नये. या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेऊन मुस्लीम समाजातील महिलांना न्याय देण्याची मागणी आम्ही केली होती." असे त्यांनी सांगितले.