'निसर्ग' चक्रीवादळाचा सर्वत्रच फटका बसला असून लोणावळ्याच्या जवळ असणाऱ्या राजमाची गावातील सर्व गावकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. राजमाची हे ट्रेकर्ससाठी अत्यंत आवडतं ठिकाण मानलं जातं. दरवर्षी अक्षरश: हजारो गिर्यारोहक राजमाचीला भेट देतात. बुधवारी आलेल्या चक्रीवादळाचा प्रभाव लोणावळ्याच्या परिसरात पाहायला मिळाला. राजमाची येथील अनेक घराचं न भरून येणारं नुकसान झाल आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक आनंद केंजले यांनी सांगितले की, "राजमाची या ठिकाणी गेली २० वर्ष मी ट्रेकिंगसाठी जात आहे. चक्रीवादळ आल्याने तेथील नेमकी काय परिस्थती आहे यासाठी फोनद्वारे व्यक्तींशी संपर्क साधला. त्यांची विचारणा केली. नागरिकांनी सांगितलेली परिस्थिती अत्यंत विदारक होती. ज्यावेळी नागरिकांनी पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ पाहिले तेव्हा वादळाचं विदारक रुप लक्षात आलं." राजमाचीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक पाड्यांवर घरांचे अतोनात नुकसान झाल आहे. राजमाची येथील उधेवडी वस्तीवर २५ घरे आहेत. तेथील बहुतांश सर्वच घराचं मोठं नुकसान झालं आहे. ज्यांची स्लॅबची घर आहेत तेवढीच व्यवस्थित राहिली आहेत. घरातील साहित्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, घरातील साहित्य वादळामुळे अस्ताव्यस्त झाले होते. घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत. बहुतेक घरांवरील पत्रे, छप्पर वादळाने उडून गेले आहेत. सगळे ग्रामस्थ बुधवारी जीव मुठीत घेऊन वादळाशी सामना करत होते. अनेक जणांनी आपला संसार वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वादळ खूप मोठे असल्याने त्यावर मात करू शकले नाहीत. घरात पावसाचे पाणी आल्याने बसायचं कुठं असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. दारं-खिडक्याचं वादळामुळे नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या भागातील पाड्यांची पाहणी करून सरकारी मदत त्यांना मिळवून देणे गरजेचं आहे, असं मत गिर्यारोहक व्यक्त करत आहेत.