पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात सलगतेसाठी निर्णय पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठय़पुस्तके तयार करण्यासाठी आता एकच अभ्यास मंडळ राहणार असून, या मंडळाअंतर्गत विषयनिहाय समित्या हे काम करतील. अभ्यासक्रमात सलगता येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, बालभारती तसेच राज्य मंडळ या तीन संस्थांच्या अंतर्गत काम करणारी सर्व मंडळे बरखास्त करण्यात आली आहेत. राज्यात आतापर्यंत पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तयार करत असे, तर या अभ्यासक्रमानुसार पाठय़पुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करत असे. नववी ते बारावीचा अभ्यासक्रम राज्य मंडळ तयार करत असे. या तिन्ही संस्थांच्या विषयनिहाय तज्ज्ञ समित्या, अभ्यास मंडळे, लेखनगट, कार्यगट यासाठी काम करत होते. मात्र आता ही सर्व मंडळे बरखास्त करण्यात आली असून, पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठय़पुस्तके एकच समिती तयार करणार आहे. याच समितीकडे शिक्षकांच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) अखत्यारीत हे मंडळ काम करणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करून त्याद्वारे या मंडळावरील सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. बालभारतीत विषयनिहाय समित्यांवर नेमणुका करण्यात आल्या होत्या. त्या कायम ठेवण्यात येणार आहेत. या समित्यांच्या हाताखाली नव्या अभ्यासक्रमाची सहावी ते आठवीची पुस्तके तयार होणार आहेत. मात्र, हळूहळू राज्याच्या स्तरावर एकच समिती करण्यात यावी, असे याबाबत सोमवारी जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी आणि समन्वयासाठी शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. बालभारती छपाईपुरतीच? गेली पन्नास वर्षे राज्यातील प्राथमिक अभ्यासक्रमाची म्हणजे पहिली ते आठवीची पुस्तके बालभारती तयार करत आहे. सध्या अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी एक इयत्ता याप्रमाणे सहावी ते आठवीची पुस्तके २०१८ पर्यंत लागू होणार आहेत. हळूहळू एकच अभ्यास समिती ठेवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात यावीत, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. त्यामुळे येत्या काळात बालभारतीचे काम हे पुस्तकांच्या छपाईपुरतेच मर्यादित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यस्तरीय समिती काय करणार? x पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करणे पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी निश्चित अभ्यासक्रम नाही, त्यामुळे पहिलीची काठिण्यपातळी कमी आहे, तर बारावीनंतर विविध प्रवेश परीक्षांना तोंड द्यायचे असल्यामुळे नववी ते बारावीची काठिण्यपातळी जास्त आहे. या अभ्यासक्रमात सुसूत्रता आणणे शिक्षक प्रशिक्षण, मूल्यमापन, लोकसहभागाचे धोरण ठरवणे अभ्यासक्रम केंद्रीय शिक्षण मंडळाच्या समकक्ष करण्यासाठी प्रयत्न