छत्रपती शाहू महाराजांच्या दोन अस्सल पत्रांचाही शोध मराठय़ांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या पानिपतच्या लढाईपूर्वी मराठी सैन्य आणि अब्दालीचे सैन्य यांच्या लष्कारी हालचालींचे वर्णन करणारा पत्ररूप पुरावा इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी शोधला आहे. छत्रपती शाहू महाराजांची अस्सल पत्रे व महजर (गाव पातळीवरील न्यायनिवाडा पद्धत) यांचाही शोध लागला असून त्यातून पावणेतीनशे वर्षांपूर्वीचे मराठी साम्राज्याचे महसुली चित्र, न्यायनिवाडा पद्धती यांचे दर्शन घडते. या सर्व पत्रांवर अस्सल मोहोर असल्याने त्यांच्या ऐतिहासिकता आणि अस्सलपणाविषयी कोणतीही शंका नाही. इतिहास अभ्यासकांना याद्वारे संशोधनासाठी मोठा खजिना उपलब्ध होणार आहे. इतिहास संशोधक घनश्याम ढाणे यांनी सातत्याने खासगी ऐतिहासिक घराण्यांवर लक्ष केंद्रित करून, शिवोत्तरकाळातील सरदार, वतनदार घराण्यांचा शोध सुरू केला. त्यातूनच या अस्सल पत्रांचा खजिना मिळाला आहे, अशी माहिती वसंत चॅरिटेबल फाउंडेशनच्या अध्यक्ष रजनी इंदुलकर यांनी दिली. पानिपतपूर्वीचे पत्र महत्त्वाचे पानिपतची लढाई ही मराठी इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना होती. १७६१ च्या जानेवारीत मराठी सैन्य अब्दालीच्या सैन्यावर चालून गेले. प्रचंड नुकसान सोसून मराठी सैन्याचा या लढाईत जिव्हारी झोंबणारा पराभव झाला. मात्र या लढाईपूर्वी मध्य भारतात आणि दिल्लीसह उत्तरेकडे कोणत्या राजकीय आणि लष्करी घडामोडी घडत होत्या, याचा वृत्तान्त असलेले पत्र उत्तरेकडील कारभार पाहणारे जयाजी शिंदे यांनी मारवाड प्रांतातून महाराष्ट्रात अमृतराव निंबाळकर यांना १७५५ साली पाठवलेले आहे. त्यावरून मराठी सेनेच्या पराक्रमामुळे आणि यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे अब्दालीला माघार घ्यावी लागली असून, त्याला पलायन करावे लागले असल्याची माहिती समजते. या पत्रावर शिंदे यांचा शिक्का आहे. तसेच त्यांचे कुलदैवत असलेल्या ‘ज्योतिबाचरणी तत्पर राणोजीसुत’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो.