पुणे शहरातील खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने फी वाढ करण्यात आली आहे. शाळांकडून वाढवण्यात आलेली फी आणि इतर मागण्याचे निवेदन आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पालकांच्या संघटनेनं दिलं. गायकवाड या बालभारती येथे कार्यक्रमासाठी आल्या असताना पालक संघटनांकडून हे निवेदन शिक्षणमंत्री असणाऱ्या गायकवाड यांना देण्यात आलं. मात्र गायकवाड यांच्याकडून यासंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालक आक्रमक झाले. पालकांनी बालभारतीच्या कार्यालयासमोरच वर्षा गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘वर्षा गायकवाड हाय हाय…’, ‘इतर बोर्डाच्या शाळा बंद करा… बंद करा…’ अशा घोषणांनी पालकांनी बालभारती भवनाचा परिसर दणाणून सोडला. पालकांचा आक्रमक पवित्रा पाहून वर्षा गायकवाड यांनी पालकांचा समाना न करता थेट दुसर्‍या दाराने जाणं पसंत केल्याचं पहायला मिळालं.

बालभारती संस्थेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड पुण्यात आल्या होत्या. हा कार्यक्रमासाठी आलेल्या शिक्षण मंत्र्यांसमोर पुणे शहरातील पालक संघटनांनी खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने फी घेतली जात आहे. त्यावर सरकारने लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी आणि पालकांची या मनमानी कारभारातून सुटका करावी, असे गार्‍हाणं मांडले.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. खाजगी शाळांनी मनमानी पद्धतीने फी वसुल करु नये. यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली होती. मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे गायकवाड यांनी पालकांना सांगितले. त्यावर पालक संघटनांनी आक्रमक होऊन, वर्षा गायकवाड यांच्या विरोधात कार्यालयाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

पालक संघटनांच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना पालकांची भूमिका स्पष्ट केली. खाजगी शाळांच्या मनमानी बाबत ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही. तर ३० जानेवारीला वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.