एका महिन्याच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पूर्ण शुल्क घेऊन आश्वासित केलेला अभ्यासक्रम न शिकविल्यामुळे एमईएस आबासाहेब गरवारे महाविद्यालय, महाविद्यालयाचे संचालक आणि जीएमसीसी संस्थेला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. या तिघांनी मिळून मंचाकडे तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करावे, त्याबरोबरच त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये नुकसान भरपाई तसेच खटल्याचा खर्च म्हणून एक हजार रुपये द्यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.अभिजीत श्रीनिवास चावरे (रा. अप्पर इंदिरानगर), डॉ. सुभाष हरि वैद्य (रा. कर्वेनगर) आणि नम्रता वसंत बागुल (रा. कर्वेनगर) यांनी कर्वे रस्त्यावरील एमईएस आबासाहेब गरवारे महाविद्यालय, संचालक आणि संस्थेविरुद्ध तक्रार दिली होती. या प्रकरणाचा निकाल मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितिजा कुलकर्णी यांनी दिला असून तक्रारदारांनी भरलेले निम्मे शुल्क परत देण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘सर्टिफिकेट कोर्स ऑन पेमेन्ट’ सुरू करण्यात येणार असल्याची जाहिरात देण्यात आली होती. हा अभ्यासक्रम गरवारे महाविद्यालय आणि जीएमजीसी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार तक्रारदार विद्यार्थ्यांनी गरवारे महाविद्यालयात या अभ्याक्रमासाठीचे साडेबारा हजार रुपये एवढे शुल्क भरून प्रवेश घेतला. एक महिन्याचा अभ्यासक्रम असताना फक्त सतरा दिवसच अभ्यासक्रम घेण्यात आला. त्यातील सात दिवस चाचणी परीक्षेसाठीचे होते. फक्त दहा दिवसच तासिका झाल्या. त्यामुळे सर्व विषय शिकवले गेले नाहीत. त्या बरोबर कोणत्याही प्रकारच्या नोट्स दिल्या गेल्या नाहीत.अभ्यासक्रम न शिकवला गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. म्हणून विद्यार्थ्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी मंचाने संबंधितांना नोटिसा पाठविल्या होत्या.जीएमजीसी यांनी त्यांचे म्हणणे मंचासमोर मांडून तक्रारदारांची तक्रार अमान्य केली. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असून तक्रारदार विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे वर्ग भरण्याची वेळ आणि ठिकाण कळविले जात होते. वर्गातील विद्यार्थी सुकृत कोठारी यांच्या नोट्सही या वेळी सादर केल्या गेल्या. त्यामुळे तक्रार खोटी असून ती फेटाळण्याची मागणी संस्थेने केली. त्यानंतर गरवारे महाविद्यालयाच्या संचालकांनी त्यांची बाजू मांडून तक्रारदारांचे म्हणणे नाकारले. या अभ्यासक्रमासाठी ते ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विषय व्यवस्थित शिकवले असून चाचणी परीक्षेची तयारी करून घेतल्याचे मंचासमोर सांगण्यात आले. या सर्व गोष्टींचे अवलोकन केल्यानंतर मंचाने तक्रारदारांना सदोष सेवा दिल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. महाविद्यालय आणि जीएमजीसी हे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सिद्ध करू शकलेले नाहीत. अभ्यासक्रमासाठी ठरलेल्या वेळा आणि जागा विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे अचानक कळवल्या जात होत्या. चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासल्याचे दिसून येत नाही. त्याबरोबरच कोठारी या विद्यार्थ्यांच्या नोट्स पुरावा म्हणून मंचासमोर सादर केल्या आहेत. मात्र, कोठारी यांनी या नोट्सच्या प्रती वैयक्तिक असून त्याचा महाविद्यालयाशी काहीही संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खरी असल्याचे मंचाने म्हटले आहे. या सर्व गोष्टींवरून तक्रारदारांना आश्वासित केलेला अभ्यासक्रम पूर्ण शिकवलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तिघांनी मिळून संयुक्तरीत्या तक्रारदारांना निम्मे शुल्क परत करावे असा आदेश मंचाने दिला. याबाबत प्रा. आर. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करून संबंधित न्यायालयात अपील केले जाईल.