उन्हाच्या झळांचा घारींसारख्या उंच उडणाऱ्या पक्ष्यांना त्रास होण्यास सुरूवात झाली आहे. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होऊन खाली पडणाऱ्या घारींसाठी पक्षिमित्रांना मदतीसाठी बोलावणऱ्यांची संख्या गेल्या महिन्याभरात लक्षणीय रीत्या वाढली आहे. कटलेल्या पतंगांच्या मांजांना अडकणाऱ्या पक्ष्यांची संख्याही मोठी आहे.
मार्च आणि एप्रिलमध्ये उन्हाच्या झळांचा घारींना सर्वाधिक त्रास होत असल्याचे पक्षिमित्र अनिल अवचिते यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘घारी अती उंचीवर उडत असल्याने या दिवसांत शरीरातील पाणी कमी होऊन त्या चक्कर येऊन खाली पडतात व त्यांना अशक्तपणा येतो. गेल्या एका महिन्यात माझ्याकडे असा त्रास झालेल्या घारींच्या मदतीसाठी १२५ दूरध्वनी आले, तर याच काळात मांजात अडकलेल्या १०० पक्ष्यांना काढण्यासाठी बोलवणी आली.’’
कात्रज प्राणी अनाथालयाचे माजी अभिरक्षक दीपक सावंत म्हणाले,‘‘तापमानातील चढउतार झपाटय़ाने होत असल्याने पक्ष्यांना त्याच्याशी जुळवून घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. घार व मोठे शिकारी पक्षी दुपारी कमी कष्टात उडता यावे म्हणून गरम हवेच्या झोतावर उडतात. त्यामुळे त्यांना त्रास लगेच होतो.’’
‘‘संक्रांतीला पतंग उडवणे सुरू झाल्यानंतरच्या एका महिन्यात २०० ते २५० मांजाने जखमी झालेले पक्षी सापडत असल्याचे गेल्या पाच वर्षांचे निरीक्षण आहे,’’ असे सावंत म्हणाले.
 नागरिकांनी काय करावे?
– उन्हाच्या झळा बसून खाली पडलेल्या पक्ष्याला आरामाची गरज असते. असा पक्षी सावलीत राहील असे पाहावे. त्याच्याजवळ थांबू नका वा त्याला हात लावू नका. त्याने पक्षी आणखी घाबरतो. पक्ष्याजवळ कुत्रा वा मांजरासारखा दुसरा प्राणी जाणार नाही याकडे लांबून लक्ष ठेवा.
– पक्ष्याच्या जवळ पाण्याचे भांडे ठेवा. पण त्याला जबरदस्तीने पाणी पाजू नका. असे पाणी पाजण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणाविना पाणी पाजले व ते पक्ष्याच्या श्वासनलिकेत गेले तर त्याला धोका निर्माण होऊ शकतो.
– शहरात पतंग उडवणे टाळावे. पतंग कटल्यावर त्याला लटकलेला मांजा काढून टाका किंवा नष्ट करा. शक्यतो नैसर्गिक मांजा वा साधा दोराच वापरा. चायनीज किंवा नायलॉनचा मांजा नको.
– मदतीसाठी काही दूरध्वनी क्रमांक- अग्निशमन दल- १०१, कात्रजचे मदत केंद्र- ०२०-२४३७०७४७, पक्षिमित्र अनिल अवचिते- ९४२२३४९७८९