पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसापासून पाणी कपातीचे धोरण अवलंबवण्यात येत आहे. या धोरणाच्या पार्श्वभूमीवर दोन मे पासून नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. असे असताना  महानगर पालिकेतील स्वच्छतेसाठी मात्र, पिण्याच्या पाण्याची नासाडी केली जात असल्याचे समोर आले आहे.

यंदा तापमान चाळीशी गाठत असल्यानं धरणातील पाण्याचं बाष्पीभवन अधिक होत आहे. त्यामुळे पाणी कपात लागू न केल्यास जुलैमध्ये पाण्याची कमतरता भेडसावू शकते. अस सांगत दिवसाआड पाणी पुरवठ्यावर शिक्का मोर्तब केला. सर्व पक्षीय गटनेते आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिवसाआड पाणी पुरवठा करणार असल्याचा एप्रिल महिन्यात शिक्का मोर्तब करण्यात आला होता. या निर्णयानंतर सर्व्हिसिंग सेंटर आणि बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर मज्जाव घालण्यात आला होता.

मात्र,  रविवारी चक्क पालिकेतच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ज्या नळातून  महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, उप-महापौर आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याच पाण्यातून पालिकेच्या भिंती, जिना आणि पायऱ्या धुण्यासाठी वापरण्यात आले. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा कण्याचा निर्णय घेऊन पालिकेतील कर्मचारी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करत स्वत:च आपले नियम धाब्यावर बसवत असल्याची प्रतिक्रिया सामान्य  नागरिकांच्यातून उमटत आहेत.