शहरात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना दुसरीकडे अत्यंत दिलासादायक असे चित्र आहे. कोविड आजाराचा पहिला रुग्ण शहरात आढळून आल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) ‘बालरोग करोना वार्ड’ची सुरुवात केली. हा वार्ड कोरोनाची लागण झालेल्या चिमुरड्यांसाठी अक्षरश: देवदूत  ठरत आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञ्, अनुभवी डॉकटर , चांगल्या सुविधा यामुळे एप्रिलपासून दाखल झालेला प्रत्येक करोनाबाधित बालक अगदी ठणठणीत होऊन घरी गेला आहे. अशा करोनाबाधित 175 बालकांवर आतापर्यंत यशस्वी उपचार करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मार्च महिन्यात करोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे  पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात  ‘बालरोग करोना वार्ड’ची सुरुवात केली. हा वॉर्ड 26 एप्रिल 2020 रोजी सुरू झाला. एप्रिलमध्ये 13 करोना बाधित बालकांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले. त्यानंतर मे मध्ये 17, जून महिन्यात  102 तर जुलै  43 बालकांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वय वर्ष 1 ते 12 वर्षपर्यंतच्या बालकांचा समावेश होता.

आणखी वाचा- प्रेरणादायी : ९० वर्षीय आजीबाईंची करोनावर मात; कुटुंबीयांनी केले जंगी स्वागत

याबाबत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील  बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके म्हणाल्या, “बालरोग अतिदक्षता विभागात करोना बाधित बालकांना  त्यांच्या आईसोबत ठेवण्यात आले होते. रुग्णालयात गेल्या 100 दिवसांमध्ये 175  मुलानी करोनावर मात केली. यामध्ये एकही मूल दगावले नाही. करोनाबाधित शहरांपैकी ‘ शून्य ‘ टक्के बाल मृत्यू असलेले पिंपरी चिंचवड राज्यात एकमेव आहे. लहान मुलांची प्रतिकारक्षमता आईच्या दुधामुळेच वाढते. त्यात मुल आईच्या सानिध्यात राहिल्यास इन्फेक्शन वाढण्याची भिती कमी असते. मुलाला दूर ठेवल्यास ते अस्वस्थ होते रडून रडून त्याची प्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे दाखल झालेल्या 80 टक्के मुलांची आई त्यांच्यासोबत बालरोग विभागात होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या करोनाबाधित मुलांवर उपचार करण्यासोबत मातांवरही कोरोना पॊझिटिव्ह समजूनच औषध उपचार करण्यात आले. यातून मुले आणि माता दोघेही ठणठणीत होऊन घरी परतले. प्रत्येक आई आणि मुलांच्या 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दाखल झालेल्या मुलांमध्ये ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे होती. त्यामध्ये ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते”.