पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघे १५ टक्के पाणीसाठा आहे. पाण्याअभावी शहरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. परंतु, याचे महानगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सोयर सुतक दिसत नाही. शहरातील आकुर्डी आणि किवळे परिसरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली.

सविस्तर माहिती अशी की, आकुर्डीच्या नवविकास प्राधिकरण इमारतीच्या शेजारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून ओढ्याचे स्वरूप आले होते. त्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. एकीकडे नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे. तर दुसरीकडे पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या घटनेत किवळे येथे सोमवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी पाण्याची लाईन लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे. दरम्यान, किवळे येथील पाणी गळतीविषयी पाणी पुरवठा अधिकारी रामदास तांबे यांनी आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ तीन आठवडे पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पवना धरणात १५.६८ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तो आजवरचा सर्वात कमी साठा असल्याचं सांगण्यात येत आहे. मान्सून लांबणीवर पडल्यास शहरातील नागरिकांना आणखी पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यात शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्याची नासाडी पाहायला मिळत आहे.

किवळे येथे सोमवारी, मंगळवारी पंपमिंगची लाइन लिकेज झाली होती. त्याच लिकेज काढलं होतं. आज जी घटना घडली त्याबद्दल माहिती नाही. आकुर्डी येथे वॉश आऊट सोडलं आहे. बिजली नगर येथे अंडरपास चे काम सुरू आहे. ग्रेड सेपरेटर येथील लाईन शिफ्ट करण्यासाठी पाणी नको असतं म्हणून वॉश आऊट केलेलं आहे. ते लिकेज झालेलं नाही.

रामदास तांबे, पाणी पुरवठा अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका