निवडणुकांचा हंगाम सुरू होताच; ‘आयाराम-गयाराम’ सुरू

िपपरी-चिंचवडमध्ये व्यक्तिनिष्ठेला महत्त्व देत पक्षनिष्ठा खुंटीला टांगूनच राजकारण होत असल्याचा गेल्या अनेक वर्षांपासूनच अनुभव आहे. निवडणुकांचा हंगाम सुरू झाला की सर्वच पक्षात ‘आयाराम-गयाराम’ कार्यक्रम सुरू होतो. सर्वच पक्षातील शहर पातळीवरील प्रमुख नेत्यांनी ‘कधी ना कधी’ पक्ष बदलला आहे, असे स्पष्टपणे दिसून येते.

२०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सध्याचा पक्ष बदलून दुसरीकडे जाण्याची चढाओढ सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षांतराची औपचारिकता पूर्ण केली आहे. केवळ याच निवडणुकीतील हे चित्र नसून गेल्या अनेक वर्षांचा राजकीय इतिहास पाहिल्यास, निवडणुकांचा हंगाम सुरू होताच पक्षांतराचे प्रमाण वाढते, असे दिसून येते. शहरातील विविध पक्षांचे अनेक नगरसेवक, आमदार, खासदार अथवा प्रमुख नेत्यांनी कधी तरी पक्ष बदलेलाच आहे. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिपूजा हेच शहरातील राजकारणाचे प्रमुख सूत्र राहिले आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे आधी काँग्रेस पक्षात होते, तेथून ते राष्ट्रवादीत गेले. नंतर काँग्रेसमध्ये आले. तेथून शिवसेनेत गेले. सध्या ते शिवसेनेचे खासदार आहेत. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पूर्वी राष्ट्रवादीत होते, नंतर ते शिवसेनेत येऊन खासदार झाले. गजानन बाबर यांनी नगरसेवक ते खासदार असा प्रवास शिवसेनेत केला. मावळ लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेना सोडली. पुढे मनसेत प्रवेश केला. मात्र, थोडय़ाच दिवसांत त्यांनी मनसेशी असलेला संबंध तोडून टाकला. मधल्या काळात ते भाजपच्या संपर्कात होते. पुन्हा ‘स्वगृही’ परतण्याचे वेध त्यांना लागले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप पूर्वी काँग्रेसमध्ये होते. नंतर ते राष्ट्रवादीच गेले. राष्ट्रवादीतून शेकाप आणि तेथून भाजपमध्ये गेले. सध्या ते भाजपचे आमदार व शहराध्यक्ष आहेत. िपपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक तसेच उपमहापौरही होते. ऐन वेळी ‘लॉटरी’ लागल्याने शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार झाले. भोसरीचे ‘अपक्ष’ आमदार महेश लांडगे काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीत येऊन ते नगरसेवक झाले, पुढे स्थायी समितीचे अध्यक्षही झाले. २०१४ मध्ये ते राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन अपक्ष आमदार झाले. सध्या ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. माजी महापौर आझम पानसरे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. नंतर ते राष्ट्रवादीत गेले. तेथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, तेथून पुन्हा राष्ट्रवादीत गेले. शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, तेथून राष्ट्रवादीत व नंतर शिवसेनेत जाऊन त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी पूर्वी भाजपमध्ये होते. नंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि आता ते ‘स्वगृही’ परतले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी शिवसेनेतून काँग्रेस व पुढे राष्ट्रवादी असा प्रवास केला आहे. अजित गव्हाणे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले. पुढे भाजपमध्ये गेले. तेथून ते राष्ट्रवादीत आले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर व त्यांचे समर्थक पक्षांतर करणार असल्याची चिन्हे आहेत. त्या दृष्टीने ते भाजप तसेच राष्ट्रवादीच्याही संपर्कात आहेत. याशिवाय, अनेकांनी ‘इकडून-तिकडे’ असा प्रवास केला आहे आणि बरेच जण करण्याच्या मार्गावर आहेत.

राष्ट्रवादीला िखडार

यापुढील काळात िपपरीतील ‘आयाराम-गयाराम’चा खेळ अधिक रंगतदार होणार असून त्यामुळे शहरातील राजकारण ढवळून निघणार आहे. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. केवळ योग्य वेळेच्या प्रतीक्षेत ते आहेत. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी पक्ष सोडण्याची पूर्ण मानसिकता केलेली आहे. याखेरीज, राष्ट्रवादीच्या तसेच शिवसेनेच्या संपर्कातही इतर पक्षातील प्रमुख कार्यकर्ते आहेत. मनसेचे प्रमुख पदाधिकारी दुसऱ्या पक्षाची चाचपणी करत आहेत.