आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जातीयवादी पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांकडून पोकळ प्रचार, अफवांचा बाजार, तसेच दंगली घडवून आणल्या जाण्याची शक्यता असून या सर्व आव्हानांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे उत्तर द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे सोशल मीडियाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण काँग्रेस कार्यकर्त्यांना शिबिरांमधून दिले जाणार आहे. या उपक्रमातील पहिल्या शिबिराचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने झाला. या वेळी त्यांनी संघ तसेच अन्य संघटनांवर जोरदार टीका करत या सर्वाच्या अपप्रचाराला तोंड देण्यासाठी आणि सत्य काय आहे ते जनतेला सांगण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन प्रशिक्षणार्थीना केले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळातील हर्षवर्धन पाटील, डॉ. पतंगराव कदम यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे आणि निवडणुकीत ते फायदेशीर होईल हे आधीच लक्षात घेऊन समाजातील एका विशिष्ट वर्गाने ते काबीज केले आहे. त्या माध्यमाचा वापर आपण प्रभावीपणे करणे हे आपल्यासमोरील राजकीय आव्हान आहे. येणाऱ्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर अफवा पसरवल्या जातील, तसेच पोकळ प्रचारदेखील होईल. एखादी खोटी गोष्ट दहावेळा सांगितल्यानंतर तीच खरी वाटू लागते. या गोबेल्स नीतीचा वापर या वेळी वाढेल. संघासारख्या संघटनेने हे तंत्र यशस्वी केले आहे. त्याचाच वापर पुन्हा त्यांच्याकडून होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.बाबरी पडल्यानंतर जे जातीय दंगे झाले त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला. नुकतीच घडलेली मुझफ्फरनगरची दंगल तसेच यापूर्वी घडलेली मिरज येथील दंगल यांचा विचार करता निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी जातीयवादी पक्ष व संघटना देशात पुन्हा दंगली घडवून आणण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. हा त्यांच्या रणनीतीचाच भाग आहे, असेही ते म्हणाले.लोकसभेसाठी आघाडीचपाच राज्यांच्या निवडणुकांचे दिनांक जाहीर झाले असून आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक होऊन उमेदवारांची यादी केंद्रीय कार्यकारिणीकडे जाईल. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करूनच ही निवडणूक लढवली जाणार हे स्पष्ट आहे. या निवडणुकीसाठी आता तयारी सुरू करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.