नव्या चारशे गाडय़ा आल्यानंतर जुन्या दीडशे गाडय़ा बाद

नव्या वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात चारशे गाडय़ा दाखल होणार आहेत. या गाडय़ा दाखल होताच प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार आयुर्मान संपलेल्या शंभर ते दीडशे गाडय़ा ताफ्यातून बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा ताफ्यात शंभर ते दीडशे गाडय़ांची कमतरता जाणवणार असून नव्या गाडय़ा मिळूनही पीएमपीची रडकथा कायम राहण्याची शक्यता आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ ते नऊ लाख प्रवाशांना पीएमपीकडून दैनंदिन प्रवासी सेवा दिली जाते. प्रवाशांची संख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात गाडय़ा कमी आहेत. सध्या पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार गाडय़ा आहेत. त्यातील एक हजार गाडय़ा डिझेलवर, तर उर्वरित एक हजार गाडय़ा सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. त्यातील काही गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांची संख्या लक्षात घेता ताफ्यात किमान तीन हजार गाडय़ा असाव्यात, अशी मागणी सातत्याने होते.

पीएमपीसाठी काही महिन्यांपूर्वी गाडय़ा खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी त्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सीएनजीवर चालणाऱ्या चारशे गाडय़ांसाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात या गाडय़ा पीएमपीला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र नव्या गाडय़ा ताफ्यात आल्यानंतर आयुर्मान संपलेल्या शंभर ते दीडशे गाडय़ा बाद केल्या जाणार आहेत.

पीएमपीच्या मालकीच्या गाडय़ांचे आयुर्मान संपल्यानंतरही या गाडय़ा रस्त्यावर धावतात. पीएमपी प्रशासनानेही आयुर्मान संपलेल्या गाडय़ा मार्गावर असल्याची कबुली दिली आहे. या गाडय़ांमुळे शहराच्या प्रदूषणावरही गंभीर परिणाम होत आहे. त्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्या गाडय़ा दाखल झाल्यानंतर किमान शंभर ते दीडशे गाडय़ा बाद करण्यात येतील, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

५०० इलेक्ट्रिकल गाडय़ा

शंभर ते दीडशे गाडय़ा ताफ्यातून बाद केल्या तरी त्याचा संचलनावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच गाडय़ांची कमतरताही जाणवणार नाही, असा दावा पीएमपी प्रशानसाकडून करण्यात आला आहे. या गाडय़ांबरोबच स्मार्ट सिटी अंतर्गत पाचशे इलेक्ट्रिकल गाडय़ा घेण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका त्यासाठी अर्थसाहाय्य करणार आहेत. पहिल्या टप्प्यात दीडशे गाडय़ा येणार आहेत. या प्रकारच्या गाडय़ांच्या खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नव्या वर्षांत त्या उपलब्ध होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

वारजे माळवाडी-आळंदी नवा मार्ग

वारजे माळवाडी आणि कर्वे रस्ता परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी वारजे माळवाडी ते आळंदी हा नवा बसमार्ग सुरू करण्यात आला आहे. कर्वे रस्ता, फग्र्युसन रस्ता, सिमला ऑफिस, वाकडेवाडी, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, विश्रांतवाडी असा बसचा मार्ग राहणार आहे. वारजे माळवाडी येथून सकाळी साडेसहा, अकरा, दुपारी तीन आणि सायंकाळी सात वाजता गाडय़ा सुटणार असून आळंदी येथून सकाळी साडेआठ, दुपारी एक, सायंकाळी पाच आणि रात्री नऊ वाजता गाडय़ा सुटणार आहेत.