प्रभाग क्र. ३९ : धनकवडीआंबेगाव पठार

स्थानिक गावकी आणि भावकीचे वर्चस्व असलेल्या प्रभाग क्रमांक ३९ (धनकवडी-आंबेगाव पठार) मध्ये भारतीय जनता पक्षाकडून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भापजपकडून काही जणांना पक्षात प्रवेश देण्यात आला असला, तरी पक्षापुढील आव्हान बिकट राहणार आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे वर्चस्व लक्षात घेता भाजपसाठी आणि भाजपच्या विद्यमान आमदारांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरेल असे चित्र आहे.

या प्रभागात मॉडर्न सोसायटी, विणकर सोसायटी, प्रियदर्शनी शाळा, धकनवडी गावठाण, राऊतबाग, नित्यानंद सोसायटी, दौलतनगर, गुलाबनगर, रक्षालेखा सोसायटी, कलानगर, चैतन्यनगर, संभाजीनगर, आंबेगाव पठार हा भाग प्रामुख्याने येतो. राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विशाल तांबे आणि मोहिनी देवकर यांचा संपूर्ण प्रभाग, भाजपच्या वर्षां तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवलाल भोसले यांच्या प्रभागाचा बहुतांश भाग, काँग्रेसचे अभिजित कदम आणि शिवसेनेच्या कल्पना थोरवे यांच्या प्रभागाचा मिळून हा नवा प्रभाग तयार झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे या परिसरात वर्चस्व आहे. धनकवडीचा महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर या परिसरात काही काळ भाजपचे वर्चस्व होते. मात्र त्यानंतर झालेल्या काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्थान बळकट केले. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासाठी या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. महापालिका निवडणुकीबरोबरच खडकवासला विधानसभा मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर या भागातून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. एवढेच नाही तर सन २००२ मध्ये त्रिस्तरीय प्रभाग पद्धतीने झालेल्या निवडणुकीतही भाजप-सेनेच्या पॅनेलमधील तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर हा कल ओसरत गेला. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार या भागातून निवडून आले तर भाजपच्या वर्षां तापकीर राहत असलेल्या धनकवडी प्रभागात एकाच जागेवर भाजपला समाधान मानावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने उद्योजक आणि स्थानिक गणेश भिंताडे यांना काही दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश दिला. तर राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे आणि विशाल तांबे यांना गेल्या पाच वर्षांत पक्षाने अनुक्रमे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी दिली. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकातून या प्रभागात मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेत त्यांनी या भागात विकासकामे केली. हीच कामे राष्ट्रवादी काँग्रेसची बलस्थाने ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची वाढलेली ताकद लक्षात घेऊन भाजपने येथे व्यूहरचना केली आहे. गावकीतील राजकारण लक्षात घेऊन भाजपने हालचाली सुरू केल्या असल्या, तरी या प्रभागातील निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे.